
आंध्र प्रदेश मधील पर्यटकांची कार सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिलारी घाटात पेटली, मनुष्यहानी नाही
पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटून रणरणत्या उन्हात तिलारी घाटातून परतीच्या प्रवासाला निघालेल्या पर्यटकांच्या कारला घाटात अचानक आग लागली. ही घटना रविवारी (दि.२१) दुपारी १.३० च्या सुमारास घडली.आग आटोक्यात आणण्यापूर्वीच कार जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, पर्यटकांचे काही सामान जळाले. या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी बर्निंग कारचा थरार अनुभवला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, आंध्रप्रदेश येथील पाच पर्यटक पर्यटनासाठी कारने गोव्याला आले होते. पर्यटनाचा आनंद लुटून आज दुपारच्या सुमारास ते तिलारी घाट मार्गे परतीच्या प्रवासाला निघाले. दुपारी १:३० च्या सुमारास तिलारी घाट चढत असताना घाटाच्या उत्तरार्धात त्यांची गाडी पोहोचली असता चालकास कारच्या समोरील बाजूतून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. त्याने तत्काळ प्रसंगावधान राखत कारचा वेग कमी केला. मात्र, वेळ फारच कमी असल्याने त्याने हॅन्ड ब्रेक लावून गाडी रस्त्यातच उभी केली. कारमधील पाचही पर्यटक खाली उतरले. त्यांनी कारमधील साहित्य बाहेर काढण्यास सुरुवात केली. मात्र, कारला आग लागून धुराचे मोठे लोट बाहेर पडू लागले. त्यामुळे भयभीत झालेल्या पर्यटकांचे काही सामान कारमध्येच अडकले.
दुपारच्या रणरणत्या उन्हाचा तडाखा आणि वाऱ्याची झुळुक यामुळे आग वाढत गेली त्यामुळे सामान जळून खाक झाले
www.konkantoday.com