
वानर माकडांचा गंभीर प्रश्न सुटण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार -आंबा बागायतदार अविनाश काळे*
रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील वानर माकडांचा गंभीर प्रश्न सुटण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे आंबा बागायतदार अविनाश काळे यांनी सांगितले. संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करून तो कायमस्वरूपी सोडवण्यासाठी शेतकऱ्यांना पाठबळ मिळाले पाहिजे, असेही ते म्हणाले.गेली काही वर्षे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये वानर-माकड उपद्रव सुरू आहे. त्यामुळे कोकणातील कोणतेही पीक सुरक्षित राहिलेले नाही. संख्या प्रचंड वाढल्यामुळे रोजचा उपद्रव सुरूच आहे. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक प्रचंड नुकसानी मुळे शेती, बागायती, भाजीपाला, कडधान्ये उत्पादन करणे आणि त्यावर उपजीविका करणे सर्वसामान्य शेतकऱ्यांना मुश्किल झाले आहे. आंबा राखण करण्यासाठी दोन्ही जिल्ह्यात मिळून सुमारे २५० कोटींवर खर्च होत आहेत. वानर-माकड हा शाप बनला असून ते नसतील तर कोकण समृद्ध होईल, अशीच शेतकऱ्यांची अटकळ आहे. त्यांच्या उपद्रवामुळे लवकरच ग्रामीण भाग ओसाड पडेल. सामान्य कष्टकरी शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. सुमारे दीड वर्षे यासाठी शेतकऱ्यांच्या सहकार्याने उपोषण, आमरण उपोषण ते आत्महत्येची परवानगी द्या इथपर्यंत विविध प्रकारची टोकाची आंदोलने केली आहेत. त्यावर तात्पुरता उपाय म्हणून वानर, माकडे पकडून अभयारण्यात सोडण्याचे निश्चित झाले. त्यासाठी किरण सामंत यांनी सहकार्य केले. पालकमंत्री उदय सामंत यांनी गाड्या आणि पिंजरे यासाठी निधी दिला. मात्र, दीड महिना झाला तरीही त्याला सुरवात झालेली नाही. त्यामुळे शेतकरी आणि बागायतदार नाराज आहेत. www.konkantoday.com