
कुसुमताई पतसंस्थेचा मार्च अखेर निव्वळ नफा 47 लाख
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या कुसुमताई सहकारी पतसंस्थेला गतवर्षीपेक्षा निव्वळ नफ्यात 20 टक्केने वाढ झाली आहे. 31 मार्च 2024 अखेर पतसंस्थेच्या ठेवी 35 कोटी 1 हजार रूपयांवर पोचल्या आहेत. पतसंस्थेवरील सभासदांच्या विश्वासामुळे हे यश मिळवू शकलो, असे अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. दत्तात्रय उर्फ नाना शिंदे आणि उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी सांगितले.कुसुमताई सहकारी पतसंस्थेचा 31 मार्चअखेरचा लेखाजोगा नुकताच सादर करण्यात आला. सतत 20 वर्ष सातत्याने नफा मिळवतानाच आँडीटचा अ वर्ग प्राप्त केला आहे. वाढती कर्ज मागणी व ठेवींचा तेवढाच ओघ सभासदांच्या विश्वासाचे प्रतिक आहे. सभासदांचा विश्वास आम्हाला स्फुर्ती देणारा असल्याचे अध्यक्ष शिंदे यांनी सांगितले. मार्च अखेरीस भागभांडवल 66 लाख 86 हजार रूपये आहे. पतसंस्थेच्या ठेवी 35 कोटी 1 हजार रूपये, कर्ज 27 कोटी 72 लाख, गुंतवणूक 10 कोटी 24 लाख, कर्जवसुली 97 टक्के, सीडी रेशो 72.90 टक्के, नफा 47 लाख रुपये इतका आहे. पतसंस्थेचा स्वनिधी 1 कोटी 62 लाख रूपये असून 6 हजार 630 सभासद आहेत. गतवर्षीपेक्षा भागभांडवलात 10.74 टक्केने वाढ झाली असून ठेवी 11 टक्केने वाढलेल्या आहेत. एकुण कर्जामध्ये 11.67 टक्केने वाढ झाली आहे. निव्वळ नफ्यात 20 टक्केने वाढ झाली आहे. दररोज 5 लाख रुपये पिग्मी गोळा होत असते.कुसुमताई पतसंस्थेने अल्पावधीमध्येच रत्नागिरी तालुक्यासह शृंगारतळीतील ग्राहकांमध्ये नाव मिळवले आहे. ग्राहकांसाठी चांगल्या सुविधा पंतसंस्थेकडून देण्यात आल्या आहेत. पतसंस्थेच्या एकुण सहा शाखा आहेत. सर्व शाखा डिजिटल, क्यु आर कोड सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. सोनेतारण कर्जाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विज बिल भरण्याची सुविधा सर्वच शाखांमध्ये उपलब्ध असल्याचे श्री. शेवडे यांनी सांगितले.