
तटरक्षक दलाकडून शहराजवळील कुर्ली समुद्रकिनारी सकाळी स्वच्छतामोहीम
सागरी वनस्पती, प्राणी यांचे संरक्षण आणि सागरी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी स्वच्छ समुद्रकिनारे आणि समुद्र याबद्दल जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. म्हणून काल जगभर आंतरराष्ट्रीय किनारी स्वच्छतादिन २०२३ पाळण्यात आला आहे. त्या निमित्ताने तटरक्षक दलाकडून शहराजवळील कुर्ली समुद्रकिनारी सकाळी स्वच्छतामोहीम राबवण्यात आली. प्लास्टिक कचऱ्यासह एकूण ८० किलो कचरा गोळा करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी भारतीय तटरक्षक रत्नागिरीने आंतरराष्ट्रीय किनारी स्वच्छतादिनानिमित्त रत्नागिरी शहराजवळील कुर्ली समुद्रकिनारी सकाळी साडेसात ते नऊ या वेळेत स्वच्छतामोहीम राबवली. स्वच्छतामोहीम मत्स्य व्यवसाय विभाग, एनसीसी कॅडेट्स, सागर सीमामंचचे स्वयंसेवक आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी केली. स्वच्छ आणि सुरक्षित समुद्रासाठी पर्यावरण संवर्धनाच्या महत्वाबद्दल जागरूकता वाढवणे हा या मोहिमेचा उद्देश होता. कार्यक्रमाचे उद्घाटन कुर्लीच्या सरपंच राधिका साळवी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमात तटरक्षक अवस्थान रत्नागिरीचे कार्यकारी अधिकारी समादेशक दिनेश टामटा, अधिकारी, सागर सीमामंचच्या अधिवक्ता श्रीमती ऐश्वर्या विचारे, कुर्ली गावचे राजन तोडणकर आदी सहभागी झाले होते. या उपक्रमात मत्स्य व्यवसाय विभागाचे २३ कर्मचारी, २० एनसीसी कॅडेट्स, ग्रामस्थ व तटरक्षक दलाचे जवान असे सुमारे १२५ स्वयंसेवक सहभागी झाले होते.
www.konkantoday.com