
रत्नागिरी जिल्ह्याला मागणीच्या 80 ते 90 टक्के सीएनजी गॅस पुरवठा करण्याच्या केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांच्या सूचना
रत्नागिरी : जिल्ह्याचा सीएनजी पुरवठा वाढू लागला आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी जिल्ह्याच्या मागणीच्या 80 ते 90 टक्के सीएनजी गॅस पुरवठा करण्याच्या सूचना केल्या आहेत. यापूर्वी मागणीच्या 50 टक्केच पुरवठा होत होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक रुपेश जाधव यांनी पेट्रोलियम मंत्र्यांशी इ-मेल द्वारे पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार पेट्रोलियम मंत्रालयाकडून रत्नागिरी जिल्ह्याचा गॅस पुरवठा वाढवण्यात आल्याचे मनसेच्या जिल्हासंघटकांना कळवण्यात आले आहे.
जिल्ह्यामध्ये सीएनजी पंप मर्यादीत आहेत. परंतु, गॅसवर चालणारी वाहने खूप आहेत. त्याचबरोबर एप्रिल, मे महिन्यात पर्यटकांचा ओढा मोठ्या प्रमाणात असल्याने गॅस पुरवठ्याच्या कमतरतेमुळे पंपांवर वाहनांची गर्दी होती. मागणीच्या 50 टक्केच गॅस पुरवठा होत असल्याने वाहनधारकांची आणि रिक्षा व्यावसायिकांची गैरसोय होत आहे.
या पत्रव्यवहारावेळी जिल्ह्याच्या एकूण 55 हजार एससीएमडी मागणीपैकी केवळ 20 हजार 300 एससीएमडी इतकाच पुरवठा होत होता. पेट्रोलियम मंत्र्यांनी 16 मे रोजी दिलेल्या निर्देशानुसार मे. गेल इंडिया लि., मे. अशोका गॅस लि. कंपनीला सुमारे 39 हजार 19 एससीएमडी सीएनजी पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाकडून मनसेच्या जिल्हा संघटकांना कळविण्यात आले.