
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किरण सामंत यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतले
महायुतीच्या जागावाटपात अडथळा होऊन राहिलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतले आहे.आज सकाळी किरण सामंत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यांच्या या पोस्टची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा होती. या पार्श्वभूमीवर किरण सामंत यांना मुख्यमंत्र्यांकडून मुंबईत बोलावले जाणे, महत्त्वाची बाब मानली जात आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु आहे. भाजपकडून नारायण राणे यांनी आक्रमकपणे या जागेवर आपल्या पक्षाचा दावा सांगितला आहे. तर शिंदे गटाकडून हा शिवसेनेचा मतदारसंघ असल्याचे सांगितले जात आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे किरण सामंत लढण्यासाठी इच्छूक आहेत. गेल्या काही महिन्यांपासून किरण सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्गातून लढण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. मात्र, भाजप ही जागा शिंदे गटाला सोडायला तयार नाही. अशातच आता भाजपकडून कोणत्याही क्षणी नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर होऊ शकते, अशी चर्चा आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी किरण सामंत यांना तातडीने मुंबईत बोलावून घेतल्याची चर्चा आहे. आता एकनाथ शिंदे हे किरण सामंत यांना काय सूचना देतात, हे पाहावे लागेल.
www.konkantoday.com