
बीएसएनएलचे केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली ऑफलाईन फसवणुकीचे प्रकार जिल्ह्यात सुरू, सावध राहण्याचा इशारा
तुमचे सीम केवायसी निलंबित झाले असून टेलिकॉम रेग्युलेटरी ऍथॉरीटीने ते केले आहे. तुमचे सीमकार्ड २४ तासात बंद केले जाईल, अशा आशयाचा संदेश पाठवून ग्राहकाकडून आधार, बँक खाते तपशील मागवण्यात येत आहे. हा सर्व भाग म्हणजे फसवणूक व खोटेपणा असून लोकांनी या प्रकरणी सावध रहावे, असे आवाहन रत्नागिरी येथील बीएसएनएल अधिकार्यांनी केले आहे.बीएसएनएलच्या सीमकार्ड धारकांना पीडीएफ केलेल्या पत्रातून एक नोटीस पाठवण्यात येत आहे. या नोटीसवर कोणतीही तारीख नमूद नाही. त्यावर बीएसएनएल अक्षरी असून अधिकृत बोधचिन्ह नमूद करण्यात आले आहे. याशिवाय सत्यमेव जयते या शासकीय बोधवाक्यासोबत तीन सिंहाचे बोधचिन्ह नमूद केले आहे. याशिवाय टेलिकॉम ऍथॉरिटीचे नाव आणि बोधचिन्हही आहे.याशिवाय नोटीस असे शब्द नमूद करून प्रिय ग्राहकांच्या नावे मजकूर नमूद करण्यात आला आहे. तुमचे सीम केवायसी ट्रायने निलंबित केले असून ते २४ तासात बंद करण्यात येईल, तत्काळ कॉल करा, असे म्हणून राहुल शर्मा व विशिष्ट फोन नंबर दिला आहे. काही ग्राहकांनी घाबरून जावून यावर फोन केला असता आधार क्रमांकाची मागणी व केवायसी अपडेशनसाठी ५ रुपये मागणी करण्यात येते. हे ५ रुपये घेण्यासाठी बँक खाते तपशीलही मागण्यात येतो. हेच काम बीएसएनएल कार्यालयात जावून केले तर चालेल का, असा प्रश्न वचारला असता तेथे असे अपडेशन नाही, तुम्हाला ऑनलाईन करावे लागेल, असे सांगण्यात येत आहे. रत्नागिरीच्या बीएसएनएल अधिकार्यांकडे संपर्क साधला असता हे संदेशपत्र फसवणूक असून ग्राहकांनी त्याला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन केले आहे. www.konkantoday.com