
भाजप आमदार आशिष शेलार आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यात हमरातुमरी
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. आजचा दिवस तसा वादळी ठरला. आधी विधीमंडळाच्या लॉबीमध्ये शिंदे गटाचे दोन नेते आपापसांत भिडले.त्यानंतर सभागृहात भाजप आमदार आशिष शेलार आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यात हमरातुमरी झाल्याचं पाहायला मिळालं. 227 आणि 236 वरून आरोप करणारे राजकारण करत आहेत. सभागृह किती वेळ चाललं, याचा आव आणला जातो, पण तुमचं सरकार असताना किती दिवस अधिवेशन घेतलंत, सभागृह चालवलं? असं आशिष शेलार सभागृहात बोलताना म्हणाले. संसद सुरू होती, अन्य राज्यातील विधानसभा सुरू होत्या, यांना आज सभागृहाच्या कामकाजाची आठवण येतेय, असं म्हणत आशिष शेलारांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं.त्यानंतर याच मुद्द्यावरुन आशिष शेलार – भास्कर जाधव यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. खडाजंगीनंतर प्रकरण हमरीतुमरीपर्यंत गेलं. आशिष शेलार आणि भास्कर जाधव यांच्यात एकेरी भाषेत हमरीतुमरी झाली. त्यानंतर हे सभागृह आहे, नाचायला स्टेज आहे का? असं म्हणत शेलारांनी भास्कर जाधवांना सणसणीत टोलाही लगावला आहे. www.konkantoday.com