
*गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळेपर्यंत मिल मजदूर संघ कृती समितीचा लढा सुरूच रहाणार ..!* २७ फेब्रुवारीला विधानभवनावर भव्य मोर्चा
__ओरोस(प्रतिनिधी) मुंबईच्या गिरणी कामगारांना गिरण्यांच्या जमिनीवर तसेच अन्यत्र घरे मिळावीत आणि तीही लवकरात लवकर मिळावीत या मागणीसाठी येत्या २७ फेब्रुवारी रोजी गिरणी कामगारांचा भव्य मोर्चा विधानभवनावर नेण्यात येणार असून या मोर्चात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष कामगार नेते बजरंग चव्हाण यांनी केले आहे. ओरोस येथील जिजामाता हॉस्पिटलच्या सम्हागृहात आयोजित करण्यात आलेल्या कामगारांच्या बैठकीत चव्हाण यांनी वरील आवाहन केले.बैठकीला गिरणी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. गिरण्या बंद पडल्यानंतर मुंबईतील गिरणी कामगार आपापल्या गावी गेल्यामुळे विखुरलेला आहे.त्यांना घरे मिळवून देण्यासाठी संघाने जे प्रयत्न चालवले आहेत त्याची माहिती देण्यासाठी आणि मोर्चाच्या तयारीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला हजर ओरोस, पणदूर,अणाव, हुमरमळा,सुकळवाड,गवराई,तळगाव,कुडाळ आदी गावातून गिरणी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. या बैठकीत कामगारांना मार्गदर्शन करताना चव्हाण यांनी गिरणी कामगारांच्या आंदोलनाचा इतिहास सांगत मिल मजदूर संघाने आतापर्यंत सुमारे १८ हजार कामगारांना घरे मिळवून दिल्याची माहिती दिली.सुमारे एक लाख ५१ हजार कामगार घरांसाठी पात्र असून या सर्वाँना लवकरात लवकर घरे मिळवून देण्याचा संघाचा निर्धार आहे.१९८२ च्या गिरणी संपानंतरच्या कामगारांना घरांसाठी पात्र ठरविण्यात आले असले तरी ज्या आठ गिरण्या आधीच बंद पडल्या होत्या त्यातील कामगारांनाही घरे द्यावीत अशी मागणी संघाने सरकारकडे लावून धरली आहे अशी माहितीही चव्हाण यांनी यावेळी दिली. संघाचे अध्यक्ष सचिन अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटना कृती समितीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या या भव्य मोर्चात सर्व कामगारांनी आपल्या कुटुंबियांसमवेत सहभागी व्हावे असे आवाहन चव्हाण यांनी यावेळी उपस्थित कामगारांना केले. बी. डी. डी. चाळ,धारावी पुनर्वसन प्रकल्पातील घरे,एन. टी.सी.गिरण्यांच्या रिक्त जमिनी, मिठागरातील जमिनी गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी मिळाव्यात,मुंबई,ठाणे,कल्याण ,डोंबिवली,अंबरनाथ आदी परिसरातील सरकारी मालकीच्या ११० एकर जमीन कामगारांच्या घरांसाठी मिळाव्यात,संक्रमण शिबिरातील घरे कामगारांना देण्यात यावी,सरकारी योजनेतील घरे कामगारांना मिळावी आदी मागण्या धसास लावण्यासाठी हा मोर्चा यशस्वी करावा असे आवाहन चव्हाण यांनी केले. या बैठकीत कामगार नेते अण्णा (रघुनाथ) शिर्सेकर,श्यामभाऊ कुंभार यांनीही कामगारांना मार्गदर्शन करत मोर्चात मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन कृती समितीच्या वतीने केले. बैठकीला शिवाजी मंदिर ट्रस्ट चे संचालक राजेश नरे हेही उपस्थित होते. बैठकीनंतर घरांसाठी ज्या कामगारांनी अर्ज केले आहेत व त्यात काही त्रुटी राहिल्या आहेत,जे अपात्र ठरले आहेत,त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.www.konkantoday.com