
जिल्ह्याच्या ठिकाणी साहित्य संस्कृती भवन; साहित्य संमेलन समारोपात मुख्यमंत्र्यांची घोषणा
अखिल भारतीय शतकमहोत्सवी मराठी साहित्य संमेलनावेळीही आमचीच राज्यात सत्ता असेल, असा दावा करुन शतक महोत्सवी संमेलनाचा जागतिक स्तरावर नावलौकिक राहील, अशा पद्धतीने नियोजन केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी साहित्यनगरीत रविवारी अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला, समारोपात दृरदृश्य प्रणालीव्दारे मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. महाराष्ट्राच्या विकासावर लक्ष ठेवता-ठेवता डोळय़ांवर ताण पडल्याने शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे इच्छा असूनही संमेलनास येता आले नाही, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या अनुपस्थितीचे कारण दिले. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी साहित्य-संस्कृती भवन निर्माण करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करणार असून तालुक्याच्या ठिकाणी ग्रंथयात्रा, ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्याची सूचना त्यांनी केली.
बोलीभाषा मायमराठीला श्रीमंत करतात. बोलीभाषेचा गोडवा इंग्रजीच्या अवास्तव आग्रहामुळे संपू नये, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी, मराठी भाषा संवर्धनासाठी विधिमंडळात होत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांनी, गतवर्षीचे संमेलन महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या विचारांच्या भूमीत झाले. याच विचारांच्या परंपरेचा धागा अमळनेरला जोडला गेल्याचे सांगितले.
www.konkantoday.com