
टंचाई आराखड्यात वाड्यांची संख्या दुपटीने वाढली*
*___यावर्षी चिपळूण तालुक्यात दरवर्षीच्या सरासरी तुलनेत पाऊस अत्यल्प पडला. शिवाय सप्टेंबरनंतर तो गायबही झाला. त्यामध्ये डेरवण व कळवंडे धरण दुरूस्तीला काढले गेल्याने साहजिकच यावर्षी पाणीटंचाईची झळ बसणार, हे निश्चित झाले आहे. त्यामुळेच तयार करण्यात आलेल्या तालुक्याच्या संभाव्य पाणीटंचाई आराखड्यात गतवर्षीच्या तुलनेत टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. ही संख्या ७१ वाड्यांवरून यावर्षी १५९ वर पोहचली आहे.तालुक्यात सरासरी चार ते साडेचार हजार मि.मि. पाऊस कोसळतो. मात्र तरीही फेब्रुवारी महिना संपला की, ग्र्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके जाणवायला सुरूवात होते. आतापर्यंत पाणीटंचाई निवारणासाठी यापूर्वी कोट्यवधींचा निधी खर्च पडला असला तरी उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दरवर्षी अनुभवायला मिळते. यामध्ये धनगरवाड्यांच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तालुक्यात पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण होणार हे जानेवारी महिन्यातच टेरव गावातून झालेल्या टँकरच्या मागणीतून अधोरेखित झाले. www.konkantoday.com