
सर्वसामान्यांचे प्रवाशांचे साधन असलेल्या एसटीतून प्रवास करणार असाल तर आता तुमच्या खिशाला चाट बसण्याची शक्यता
सातत्याने होणारी डिझेल दरवाढ, करोनामुळे कमी झालेले प्रवासी उत्पन्न, महागाई भत्त्यासह अन्य खर्चात झालेली वाढ यामुळे एसटीवरील आर्थिक भार वाढत आहे. परिणामी प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. १७ टक्क्यांपर्यंत भाडेवाढीचा प्रस्ताव असून किमान भाडेवाढ ५ रुपये असेल. लवकरच राज्य सरकार व एसटी महामंडळाकडून यावर अंतिम निर्णय होणार आहे.
एसटीची भाडेवाढ ही सहा किलोमीटरच्या टप्प्यानंतर होत असते. प्रस्तावानुसार साध्या गाडीचे दर हे नऊ किलोमीटरपासून पुढे वाढणारे आहेत. १०० किलोमीटरपर्यंत साधारण २० ते २५ रुपयांची वाढ होणार असून त्यापुढील प्रवासासाठी प्रवाशांच्या खिशाला आणखी कात्री लागेल.करोनाची धास्ती, निर्बंध यामुळे एसटीची प्रवासी संख्या कमी झाली. उत्पन्न कमी झाल्याने महामंडळाला मार्च २०२० पासून ते आतापर्यंत चार हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
महागाई भत्ता ७ टक्क्यांवरून १२ टक्के झाला आणि त्यामुळे महामंडळावर ५३ कोटी रुपयांचा भार पडला आहे. इंधन खर्च, टायर खर्चासह अन्य खर्च वाढल्याने वर्षाला ९५० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार एसटी महामंडळ सहन करत आहे.
‘डिझेल दरवाढीमुळे दररोज दोन कोटी रुपये व त्यापेक्षा जास्त भार पडत आहे. त्यातच अन्य खर्चही आहेत. ‘त्यामुळे उत्पन्नासाठी वेगवेगळे पर्याय समोर आले असून त्यात भाडेवाढीच्या पर्यायाचा समावेश आहे. ‘भाडेवाढीचा प्रस्ताव अतिरिक्त मुख्य सचिवांच्या समितीकडे विचारविनिमयासाठी पाठवला आहे, असे परिवहन मंत्री व एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी सांगितले.
www.konkantoday.com