
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांचे 26 जानेवारी रोजी आंदोलन
रत्नागिरी : आंबा बागायतदारांचे प्रश्न सोडविण्याकडे सरकार आणि शासन दुर्लक्ष करत आहेत. यासाठी 26 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची दखल घेऊन पालकमंत्री उदय सामंत यांनी समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठकीचे नियोजन करावे, अन्यथा भविष्यात बागायतदारांना उग्र आंदोलन करावे लागेल, असे निवेदन कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विके्रते सहकारी संस्था, आंबा उत्पादक संघ यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांना हे निवेदन देण्यात आले असून यावेळी प्रदीप सावंत, बावा साळवी, विकास सावंत यांच्यासह अन्य बागायतदार उपस्थित होते. प्रतिकूल हवामान, अवेळी पाऊस, वादळीवारे, कोरोना संकट या कारणांमुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यंदाही आंब्याला योग्य भाव, हमीभाव सुनिश्चित करणे आवश्यक आहे. याबाबत शासनाला स्थानिक मंत्री, आमदार यांना वेळोवेळी निवेदने दिली आहेत. याकडे कोणीही गंभीरतेने पाहत नाही. यासाठी26 जानेवारीला सकाळी मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदना करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय बागायतदारांनी घेतला आहे.