
लोकप्रियतेसाठी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही,सर्वंकष आढावा घेऊन त्यानंतरच नुकसानभरपाई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आज चिपळूण येथील पाहणी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुढील महत्त्वाचे मुद्दे मांडले;
केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी आत्ता लगेच काहीतरी घोषणा करणार नाही. राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन त्यानंतरच नुकसानभरपाई संदर्भामध्ये जाहीर करण्यात येईल तसेच केंद्राकडूनदेखील काय आणि किती मदत मागायची ते ठरवता येईल.
मदत करताना तांत्रिक मुद्द्यांवर अडचणी येऊ नयेत या संदर्भातील सूचनादेखील मी प्रशासनाला केल्या आहेत.
यापुढे अशा घटना घडू नये म्हणून पूर व्यवस्थापन करणारी योग्य यंत्रणा कार्यान्वित करणार आहोत.
दोन-चार दिवसांमध्ये राज्यातील पूरपरिस्थितीतील नुकसानीचा आर्थिक आढावा घेण्यात येईल, मात्र आत्ता लगेच तातडीची मदत म्हणून अन्न, औषध, कपडेलत्ते व इतर आवश्यक गोष्टी पूरग्रस्तांना तात्काळ देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकार्यांना निर्देश दिले आहेत.
वारंवार संकटे येत आहेत हे लक्षात घेऊन या सर्व संबंधित जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येईल. राज्य आपत्ती निवारण दले म्हणजेच एसडीआरएफ आहेच, पण ते अधिक सक्षम करू.