
मराठ्यांचे वादळ मुंबईकडे; मनोज जरांगे यांची हजारो कार्यकर्त्यांसह कूच
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी साडेचार महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे आंदोलन करीत आहेत. दरम्यान, सरकारला दोन वेळा मुदत देऊनही ठोस निर्णय झाला नाही.त्यामुळे आता मुंबईत उपोषण करण्यासाठी जरांगे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी हजारो समाजबांधव अंतरवाली सराटीतून मुंबईकडे निघाले आहेत.
आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे २९ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. दरम्यान, पोलिस-आंदोलक यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीनंतर या आंदोलनाला राज्यातून मोठा पाठिंबा मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्रिमंडळाचे शिष्टमंडळ आणि राज्य शासनाच्या कायदा तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर जरांगे यांनी शासनाला दोन वेळा मुदतवाढ दिली. पण, मराठा आरक्षणाचा ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे जरांगे यांनी जाहीर केल्याप्रमाणे शनिवारी ते अंतरवाली सराटी येथून मुंबईसाठी रवाना झाले. सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या पदयात्रेला प्रारंभ झाला.
अंतरवालीतून हजारो समाज बांधव हाती भगवे झेंडे, गळ्यात भगवे रुमाल, डोक्यात टोप्या घालून चालत होते. ठीक ठिकाणी जरांगे यांचे महिलांनी औक्षण केले. पुढे गावोगावी यात आणखी भर पडली गेली. पदयात्रेत सहभागींनी जोरदार घोषणाबाजी करीत मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय परत न येण्याचा निर्धार केला.
www.konkantoday.com