
पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, सुप्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर, ज्येष्ठ समाजसेवक डॉ.विकास आमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्य अहवालाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न.रत्नागिरीकरांची सेवा करणे हीच माझी प्रामाणिक इच्छा:- उदय सामंत.
रत्नागिरी* मी या कार्य अहवाल प्रकाशनाच्या कार्यक्रमाला यायच्या आधी उदयला पहिल्यांदाच सांगितलं होते की तू अहवाल जर प्रसिद्ध करत असशील आणि त्याच्यातील एक जरी गोष्ट मला खोटी आढळून आली तर मी त्यावर जाहीर रित्या बोलेन आणि ते चालणार असेल तर मला कार्यक्रमाला बोलावं. म्हणून त्याने अहवालाची ही चित्रफीत बनवून घेतली. असा अहवाल सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रत्येकाने जनतेला सादर करायला हवा. विरोधी पक्षाला सुद्धा आम्ही मत दिली, म्हणून ते विरोधी पक्षाचे नेते झाले. त्यामुळे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की तुम्ही तुमच्या कारकिर्दीत काय केलं हे लोकांना कळायला हवे. हे केवळ “उदय” पुरत मर्यादित राहता कामा नये. कारण सरतेशेवटी तुम्ही सर्व आमच्यासाठी आहात. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आपल्या कामाचा अहवाल जनतेला सादर करणे आवश्यकच आहे, असे मत सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी रत्नागिरी येथे बोलताना व्यक्त केले. रत्नागिरी येथे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात रत्नागिरी आणि रायगड ते पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांचा गेल्या पाच वर्षातील कामाचा कार्य अहवाल उदय पर्व या नावाने आज प्रकाशित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी अभिनेते नाना पाटेकर हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर, पालकमंत्री नामदार उदय सामंत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विकास आमटे, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर श्रीरंग कद्रेकर, उद्योजक गद्रे, ज्येष्ठ उद्योजक तथा पालकमंत्री उदय सामंत यांचे वडील अण्णा सामंत तसेच भैरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मुन्ना शेठ सुर्वे आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना अभिनेते नाना पाटेकर ना. उदय सामंत यांना उद्देशून पुढे म्हणाले, उदय, शेवटी तू कोण, कुठल्या पक्षाचा याला याला आमच्या दृष्टीने महत्त्व नाही. तू आमच्यासाठी काय करतोस हे महत्त्वाचं आहे. त्यातील सातत्य तू टिकवलस तर असं म्हणता येईल की आम्हीच नाही तर आमची मुले तुला मत देतील. त्यांची मुल सुद्धा मत देतील. आजपर्यंत मला कोणी जात धर्म विचारला नाही. त्याचं कारण हे आहे की माझी जात ही कलावंताची आहे. मला जितकं काही छान करता येईल तेवढं करण्याचा मी प्रयत्न करीत राहणार आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला ते आवडत राहील तोपर्यंत तुम्ही या थिएटरमध्ये मला पाहायला येणार. पन्नास वर्षे होऊन गेली. मी नाटकात सिनेमात काम करतोय. पन्नास वर्षे या स्वभावात सकट आणि या क्षेत्रात टिकून राहणं सोपे नाही …मी स्वभावाने अतिशय विचित्र आहे, तिरसट आहे. रागावतो बोलतो, पण मला असं वाटतं की नट म्हणून मी ज्यावेळी ते काम करतो त्यावेळी मी माझा जीव ओतायचा असतो. रत्नागिरी हे माझं आजोळ आहे. माझी आई इथली. आई खूप शिव्या द्यायची ती सवय कदाचित मला लागली असेल. मग मी कधी कधी सांगतो ती माझी मदर टंग आहे. ज्यावेळी तू सुरुवात केलीस राजकारणी म्हणून… त्यावेळी नेमकं काय करायचं याची कल्पना नसते. मी नाटकात आलो आणि आमच्या नशिबाने आमच्या आजूबाजूला विजयाबाई, अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, उमाकांत देशपांडे अशी दिग्गज मंडळी मिळाली. त्यामुळे त्यांचं बोट धरून आम्ही चालू लागलो परंतु आम्हाला माहितीच नाही की त्यानी कधी बोट काढून घेतलं आणि आम्ही स्वतःच्या पायावर चालू लागलो. पण ती फार मोठी दिग्गज मंडळी होती. तू राजकारणात आल्यावर तुझ्या वाट्याला कोण नेमकी माणसं आली हे मला माहिती नाही. पण निश्चितपणे छान, चांगली माणसंच वाट्याला आलेली असणार हे नक्की. आई-वडिलांचे संस्कार होते. आजूबाजूला शेकडो मंडळी उभी होती. तुला कोणी काही गूळ खोबरे दिले नव्हतं …हे खा …राजकारणी हो. त्यामुळे यापुढेही चांगले काम करीत जा…ही जनता पाठीशी राहील, नक्की पाठीशी राहील. असेही नाना पाटेकर म्हणाले. *रत्नागिरी कॅलिफोर्निया पेक्षा सुंदर : माशेलकर*वरिष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यावेळी म्हणाले, रत्नागिरी हे कॅलिफोर्निया पेक्षाही सुंदर आहे. येथे मनाची श्रीमंती…चांगले आचार विचार जेव्हा दोन्ही एकत्र येतात .. तेव्हा खूप काही चांगले घडते. शिक्षणातून रत्नागिरीचा विकास होणार हे बरोब्बर हेरून उदय जी आपण रत्नागिरीत विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शिक्षण हेच भवितव्य घडविते.नाना आणि मी महा नगर पालिकेच्या मराठी शाळेत शिकलो. पण मराठीत शिकल्याने दोघांचेही काही अडले नाही. एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ज्या समाजात शिक्षकाला प्रतिष्ठा नाही त्या देशाचा विकास होऊ शकत नाही, असेही माशेलकर म्हणाले. *उदयने कुष्ठरोग्यांच्या समस्या समजावून घेतल्या : विकास आमटे*यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे म्हणाले, मी राजकीय कार्यक्रमांना जात नाही. मी चित्रपट पाहत नाही. मात्र उदय याने प्रेमळ धमकी दिल्याने मला यावे लागले. परंतु एक गोष्ट आवर्जून सांगतो की उदय आमच्या आनंद वनात आला होता. त्याने तेथील कुष्ठरोग्यांच्या समस्या समजावून घेतल्या आणि त्या सोडविण्याचा मनोमन प्रयत्न केला. त्यासाठी अधिकाऱ्यांना सातत्याने आनंदवनात धाडले. आणि सातत्याने त्याच्याकडून आमच्या या आनंदवनातील कुष्ठरोग्यांसाठी मदत होत आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. उदयला सामाजिक भान खूप चांगले आहे, असेही आमटे म्हणाले. पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यावेळी बोलताना म्हणाले, दिग्गजांच्या हस्ते माझ्या कार्य अहवालाचे प्रकाशन होते आहे. हा मोठा सन्मान आहे. भाग्याचा क्षण आहे. वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर माशेलकर यांच्या माध्यमातून न्यू एज्यूकेशन पॉलीसी राज्यात आणली गेली. सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे, नाना यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली.आजपर्यंत प्रामाणिकपणे काम केले. यापुढेही असेच काम करीन. मेडिकल कॉलेज रत्नागिरीत होणार नाही असे अनेक जणांचे म्हणणे होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी शासकीय मेडिकल कॉलेजचे स्वप्न साकार केले. अभियांत्रिकी कॉलेज मिळाले.एक वर्षात वातानुकूलित मेडिकल कॉलेज उभे राहिले. रत्नागिरी आता एज्युकेशनल हब झाले आहे. विमानतळावरील धावपट्टी राज्यात उत्कृष्ट ठरली आहे. प्रवासी टर्मिनल साठी १०० कोटी मंजूर झाले आहेत. ३०८ कोटी क्रुझ टर्मिनल साठी काल रात्री मंजूर झाले. रत्नागिरीचा आमदार म्हणून जगात कुठेही सांगताना मला अभिमान वाटतो.शासकीय इमारतींना महान व्यक्तींची नावे दिली आहेत.राजकारण हा माझा व्यवसाय नाही, धंदा नाही, आणि उद्योग मंत्री असलो तरी राजकारण माझा उद्योग नाही, असेही सामंत म्हणाले. यावेळी १०० वर्षे कार्यरत भारत शिक्षण मंडळ या संस्थेला २५ लाख मदतीचा धनादेश वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते देण्यात आला. सव्वाशे वर्षापासून कार्यरत श्री मारुती गणपती पिंपळ पार ट्रस्ट यांच्या टिळक आळी गणेशोत्सव मंडळाला १० लाखांचा मदत निधीचा धनादेश समाजसेवक डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय नाट्य परिषदेला २५ लाखाचा धनादेश अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनलाही कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले. रत्नागिरीतील विविध सामाजिक, सांस्कृतिक संघटनानी आपल्याला भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. एमआयडीसीच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने अशी भवने उभारण्यासाठी रत्नागिरीत दहा भूखंडाचे १० सामाजिक संस्थांना यावेळी मोफत वितरण करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.





