
कोकण रेल्वे मार्गाचे मुद्रीकरण केल्यास कोकणातील लोकांवर भाडेवाढीचे संकट; केआरसी एम्प्लॉईज युनियन आक्रमक
रत्नागिरी : केंद्र सरकारकडून रेल्वे मार्गाचे मुद्रीकरण करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. त्याला मूर्त स्वरुप मिळालेले नसले तरीही कोकण रेल्वे मार्गाचे मुद्रीकरण केल्यास कोकणातील लोकांवर भाडेवाढीचे संकट आवासून आहे. मालगाडी भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. कोकण रेल्वेचे मुद्रीकरण करू नये, अशी भूमिका केआरसी एम्प्लॉईज युनियनने घेतली आहे. यासंदर्भात केआरसीईयुचे अध्यक्ष सुभाष मळगी यांनी पंतप्रधानांना एका पत्राद्वारे साकडे घातले आहे.
कोकण रेल्वे मार्गाचे मुद्रीकरण केले गेले तर हा प्रकल्प भाड्याने घेणारा चालक प्रवासी भाडे वाढविण्याचे स्वातंत्र्य व निश्चित माल वाहतुकीची हमी घेईल. हा प्रकल्प कोकण रेल्वेने अत्यंत कार्यक्षमतेने हाताळला आहे. मुद्रीकरणामुळे कोकणातील लोकांवर भाडेवाढीचे संकट व मालगाडी भाड्याचा अतिरिक्त भार पडू शकतो. कोकण रेल्वेच्या सर्व साडेपाच हजार कर्मचार्यांचे केआरसीईयु प्रतिनिधीत्व करत आहे. त्यामुळे युनिअनने कोकण रेल्वेच्या कर्मचार्यांबरोबरच कोकण रेल्वेचा वापर करणार्या सर्व घटकांपर्यंत होऊ घातलेल्या मुद्रीकरणामुळे होणार्या दूरगामी दुष्परिणामांबद्दल माहिती पोचवणे, त्यांना जागरुक करणे व कोकण रेल्वेला अकार्यक्षम प्रकल्पांच्या यादीतून बाहेर काढण्याच्या लढाईला लोकसहभाग मिळविणे, सहाय्य मिळविण्याचा निर्णय घेतला आहे, असे श्री. मळगी यांनी पत्राद्वारे पंतप्रधानांना कळविलेे आहे.
केंद्र सरकारने कोकण रेेल्वे प्रकल्प अकार्यक्षम असल्याची नोंद केली आहे. कोकण रेल्वे स्वतंत्र महामंडळ असले तरीही तिकिट दर ठरविण्यासह नवीन गाड्या चालविण्याचे अधिकार भारतीय रेल्वेकडे आहे. भारतीय रेल्वे तिकिटामध्ये प्रवाशांना 53 टक्के सुट देते. कोकण रेल्वेची कार्यक्षमता मोजत असताना याचा विचार केला जात नाही, असे त्या पत्रात नमुद केले आहे.