
बातम्यांना त्वरित प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी
माध्यमांमधील शासनविषयक बातम्यांची त्वरित दखल घेतली जाणार
नागरिकांच्या तक्रारी, सार्वजनिक समस्यांच्या जलद निराकरणासाठी प्रसिद्धी माध्यमांची होणार मदत
माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांची माहिती
मुंबई, दि. 28 मार्च : नागरिकांच्या तक्रारी आणि सार्वजनिक समस्यांविषयी विविध माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांना त्वरित प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने आज महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाद्वारे विविध माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या शासनविषयीच्या महत्त्वपूर्ण बातम्यांची दखल घेऊन त्याद्वारे शासनाची कार्यक्षमता वाढवून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव आणि महासंचालक श्री. ब्रिजेश सिंह यांनी दिली.
माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या विविध बातम्यांची शासकीय विभागांकडून तात्काळ दखल घेण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांच्या तक्रारी, समस्यांच्या निराकरणासाठी मदत होणार आहे. कार्यक्षम सेवा, वितरण यंत्रणा, समस्यांचे जलद निराकरण करणे याकरिता माध्यमांमधून प्रसिद्ध होणारी माहिती तथा बातम्यांची महत्त्वपूर्ण मदत घेता येणार आहे.
*परिपत्रकाचा प्रमुख उद्देश*•
माध्यमांशी संवाद वाढविणे• नागरिक-शासन दुवा मजबूत करणे• पारदर्शक संवाद प्रक्रिया राबविणे • नियमित माहितीची देवाण-घेवाण करणे
*कार्यपद्धती*• प्रत्येक विभागात नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती • बातम्यांची त्वरित दखल • साप्ताहिक कृती अहवाल• मासिक पुनर्विलोकन बैठका*अपेक्षित परिणाम:*• बातम्यांची त्वरित दखल घेऊन जलद तक्रार निवारण• नागरिकांच्या समाधानात वाढ• प्रशासकीय कार्यक्षमता वृद्धी• सुशासन, प्रतिमा बळकटीकरण
“हे परिपत्रक म्हणजे पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे माध्यमांमधून प्रसिद्ध होणारी माहिती आणि बातम्यांची दखल घेऊन त्याद्वारे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिक प्रभावी यंत्रणा कार्यान्वित होईल, असे श्री. सिंह यांनी सांगितले. 0000