शिवपुतळा व राजकोट किल्ल्याची उभारणी हा केवळ कार्यक्रम नसून ती आपली सर्वांची अस्मिता आहे-रवींद्र चव्हाण
नौदल दिना निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपास्थितीत किल्ल्ले सिंधुदुर्गवर भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे. याच औचित्याने मालवण किनारपट्टीवरील किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येत आहे.बुधवारी या ठिकाणी जिल्ह्यातील 32 गड किल्यांवरल मातीत किल्ले शिवनेरी व किल्ले रायगड येथील माती एकत्रित करून हा पवित्र कलश पुतळा उभारण्यात येणार्या जागी अर्पण करण्यात आला. शिवछत्रपतींच्या या पुतळ्यामुळे ऐतिहासिक राजकोट किल्ल्याला गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
स्वराज्याच्या 34 गडकिल्ल्यांतील संकलीत करण्यात आलेली माती एकत्रित करून शिवपुतळा उभारणीच्या ठिकाणी बुधवारी भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी ढोलताशांच्या गजरात ‘माती कलश’ची भव्य रॅली काढण्यात आली. या सोहळ्यामध्ये राजकोट आणि मेढा परिसरातील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा.नीलेश राणे, राजन तेली, आ. निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, जि. प. मुख्याधिकारी प्रजीत नायर, न. प. मुख्याधिकारी विशाल तनपुरे, अशोक सावंत, दत्ता सामंत, धोंडी चिंदरकर, बाबा परब, अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर गणेश कुशे पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष विष्णू मोंडकर, किशोर दाभोलकर, अविनाश सामंत, विजय केनवडेकर, रविकिरण तोरस्कर व सवर्र् तालुक्यांचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.देशाच्या सागरी सीमा सुरक्षित रहाव्यात यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले सिंधुदुर्ग सारखे जलदुर्ग व सागरी आरमार उभारले. दरवर्षी नौदल दिन कार्यक्रम दिल्ली व इतर ठिकाणी होतो. मात्र यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सागरी आरामाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर नौदल दिन साजरा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. कार्यक्रमासाठी नौदल पूर्ण क्षमतेने काम करत आहे. या निमित्त राजकोट येथे शिवपुतळा उभारण्यात येत आहे. शिवपुतळा व राजकोट किल्ल्याची उभारणी हा केवळ कार्यक्रम नसून ती आपली सर्वांची अस्मिता आहे, ती जपायची असून त्याचा अनुभव पुढच्या पिढीलाही द्यायचा आहे. या निमित्त नौदल दिन कार्यक्रमाची शोभा जगभरात नेऊया, असे यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले.
www.konkantoday.com