मुंबईच्या दिशेने आज सकाळी निघालेली ‘मांडवी एक्सप्रेसच्याडब्या खाली आग लागण्याचा प्रकार, वेळीच उपाययोजना केल्याने दुर्घटना टळली


मडगाव ते मुंबई दरम्यान कोकण रेल्वेच्या पाठीमागच्या एका डब्याखालून आग भडकल्याने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. सावंतवाडी स्थानकाच्या मागे अर्ध्या किलोमीटरवर हा प्रकार घडल्यानंतर लगेच रेल्वे थांबवण्यात आली.त्यानंतर कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. ब्रेकमधील तांत्रिक दोषामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज उपस्थित कर्मचार्‍यांनी व्यक्त केला आहे. सुदैवाने या घटनेमुळे कोणतीही जीवित हाणी झालेली नाही.
मडगाव येथून मुंबईच्या दिशेने आज सकाळी निघालेली ‘मांडवी एक्सप्रेस’ मडुरे स्थानकावर पोहोचली. तोपर्यंत सर्वकाही ठिक होते. मात्र, या स्थानकावरून सावंतवाडीच्या दिशेने निघाल्यानंतर खळबळजनक घटना घडली. सावंतवाडी स्थानक अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असताना जनरेटर कार, दिव्यांग व गार्डसाठीच्या शेवटच्या डब्याच्या खालून आगच्या ज्वाळा भडकू लागल्या. यामुळे सावंतवाडी स्थानकावर कशीबशी गाडी आणून थांबवण्यात आली. या डब्यातील रेल्वे कर्मचार्‍यांनी स्थानकावरील अधिकार्‍यांना आगीबाबत माहिती दिली. डब्यातील महिला प्रवाशांनी घाबरून प्लॅटफॉर्मवर धाव घेतली. त्यानंतर अग्निशमनासाठी वापरण्यात येणार्‍या बॉटल्स वापरून आगीवर नियंत्रण आणण्यात आले. उपस्थित कर्मचार्‍यांनाही आग लागण्याचे नेमके कारण समजलेले नाही. मात्र, रेल्वेच्या डब्याला असलेल्या डिस्क ब्रेकमधील पॅड जळाल्याचा वास आल्याने ब्रेकमधील काही तांत्रिक कारणांमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button