
मुंबईहून गोव्याला निघालेली ट्रेन अचानक पनवेलऐवजी कल्याणला पोहोचली;
मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला सोमवारी सकाळी तांत्रिक अडथळ्यामुळे मार्ग बदलावा लागला. दिवा स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणा कोलमडल्याने गाडीला कल्याणमार्गे वळवण्यात आले.या कारणामुळे वंदे भारत एक्सप्रेसला दीड तास विलंबाचा फटका बसला.मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक २२२२९ वंदे भारत एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेत, सकाळी ५:२५ वाजता, सीएसएमटी स्थानकावरून सुटली. मात्र दिवा स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने गाडी ४० मिनिटे ठप्प झाली.
ही समस्या सकाळी ६:१० वाजता निर्माण झाली होती.दिवा स्थानकाच्या पॉईंट क्रमांक १०६ (डाउन लोकल फास्ट लाइन ते पाचवी लाइन) वर सिग्नल आणि दूरसंचार यंत्रणा कोलमडली होती. या बिघाडामुळे सकाळी ६:४५ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. परिणामी, वंदे भारतसह इतर गाड्यांनाही रखडावे लागले.विलंब टाळण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने तातडीने निर्णय घेत वंदे भारत ट्रेनला कल्याण स्थानकावर वळवले आणि तिथून तिला परत फिरवून मार्गावर आणण्यात आले. तरीही या बदलामुळे प्रवाशांना दीड तास उशिराचा त्रास सहन करावा लागला.