
,जनावरांमध्ये आलेल्या ‘लम्पी स्कीन’च्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी पीपीई किटची निर्मिती
कोरोना महामारीत माणसांना ‘पीपीई किट’चे संरक्षण मिळाले. त्याप्रमाणे जनावरांमध्ये आलेल्या ‘लम्पी स्कीन’च्या पार्श्वभूमीवर हा प्रयोग आता जनावरांमध्येही केला जातो आहे.सांगोला तालुक्यातील महूद बुद्रुकच्या जितेंद्र बाजारे या शेतकरी मुलाने जनावरांसाठीच्या पीपीई किटची निर्मिती सुरू केली आहे. बाजारे यांनी वेगवेगळ्या वयाच्या आणि वजनांच्या जनावरांसाठी पीपीई किट्स तयार केले आहेत. त्या माध्यमातून पशुधन वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना आशेचा किरण मिळाला आहे.
महाराष्ट्रात सध्या ‘लम्पी’चा प्रादुर्भाव सर्वच भागात दिसतो आहे. शेतकऱ्यांवर हे कोरोनाप्रमाणेच एक संकट आहे. विशेषतः दुभत्या असणाऱ्या गायवर्गीय जनावरांमध्ये त्याचा प्रादुर्भाव अधिक आढळतो. तो संसर्गजन्य असल्याने राज्यभरातील लाखोंच्या संख्येने पशुधन मृत्युमुखी पडले. त्यामुळे गोठेच्या गोठे रिकामे होताहेत. अगोदरच अस्मानी अन् सुलतानी संकटांशी टक्कर देता देता बेजार झालेल्या शेतकऱ्यांपुढे ‘लम्पी’चे नवे संकट उभे आहे.लाखमोलाचे पशुधन डोळ्यांदेखत पाय खोडून तडफडत मृत्युमुखी पडतेय. त्याला आधार देण्यासाठी महूदचे शेतकरी आणि गारमेंट व्यावसायिक जितेंद्र बाजारे यांनी चार महिन्यांच्या संशोधनातून जनावरांसाठीच्या पीपीई किटची निर्मिती केली आहे.
जे किट मुख्य लम्पीसह अन्य संसर्गजन्य आजारांवर मात करण्यासाठी उपयोगी ठरत आहे. त्यांनी तयार केलेल्या किटची अनेक पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी चाचणी घेऊन लम्पीच्या बचावासाठी ते योग्य असल्याचा शेरा दिला आहे.जनावरांसाठी तयार करण्यात आलेल्या पीपीई किटसाठी लॅमिनेटेड ओवन कपड्याचा वापर करण्यात आला आहे. पीपीई किट जनावराच्या अंगावर चढविल्यानंतर डास किंवा माशीचा दंश जनावराच्या थेट शरीरापर्यंत पोहोचू शकत नाही. परिणामी, दंशाअभावी जनावर बाधित होऊ शकत नाही.
www.konkantoday.com