
मुंबईतीलसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मे महिन्यापर्यंत धावणार टॉय ट्रेन, व्हिस्टाडोम कोच
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गेल्या चार वर्षांपासून बंद असलेली टॉय ट्रेन सेवा मे २०२५ पर्यंत पुन्हा सुरू होणार आहे. यंदा या सेवेचे खास वैशिष्ट्य म्हणजे व्हिस्टाडोम कोचचा समावेश असणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना अधिक चांगला अनुभव मिळणार आहे.रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस लिमिटेड (राईट्स) या सरकारी अभियांत्रिकी सल्लागार कंपनीने हा प्रकल्प हाती घेतला असून, सध्या ट्रॅक टाकण्याची आणि थांबे विकसित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.नवीन टॉय ट्रेनमध्ये व्हिस्टाडोम कोचचा समावेश करण्यात आला आहे, ज्यात काचेचे छत आणि मोठ्या खिडक्या असतील. त्यामुळे प्रवाशांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा निसर्गरम्य परिसर अधिक स्पष्ट आणि सुंदरपणे पाहता येणार आहे.
२०१७ मध्ये आंध्र प्रदेशात पहिल्यांदा अशा प्रकारचे व्हिस्टाडोम कोच सादर करण्यात आले होते आणि त्यांना प्रवाशांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील टॉय ट्रेन ही “वनराणी” नावाने ओळखली जाते. मात्र, मे २०२१ मध्ये आलेल्या तौकते चक्रीवादळामुळे या ट्रेनचा ट्रॅक उखडला आणि सेवा बंद पडली. ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी ४० कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, यात नवीन ट्रॅक टाकणे, थांबे विकसित करणे आणि टॉय ट्रेनच्या डब्यांचे नूतनीकरण यांसारख्या कामांचा समावेश आहे.