
रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून दररोज 14 हजार आंब्याच्या पेटी वाशीकडे रवाना
_रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील हापूसची आवक दिवसेंदिवस वाढू लागली आहे.दिवसा उन्हाचा ताप जाणवत असल्यामुळे आंबा काढणीयोग्य झाला आहे. दोन्ही जिल्ह्यांतून दिवसाला १४ हजार पेटी वाशी बाजार समितीमध्ये पाठवला जात आहे. आवक स्थिर असल्यामुळे पेटीचे दर २ हजारांपासून ६ हजार रुपयांपर्यंत आहेत. पहिल्या टप्प्यातील आंबा मार्चअखेरपर्यंत मिळेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.हापूसला मागणी वाढत असल्यामुळे लवकरात लवकर फळ यावे आणि त्याला चांगला दर मिळावा, यासाठी बागायतदारांचे प्रयत्न असतात. त्यासाठी बागायतीचे योग्य नियोजन केले जाते. त्याला निसर्गाची साथ मिळाली, तर शेतकऱ्याला चांगला दर मिळतो आणि त्याचा फायदा होतो. यंदा रत्नागिरीमधून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून आंबापेटी पाठवण्यास आरंभ झाला. पहिल्या पंधरवड्यात पेट्यांची संख्या कमी होती; मात्र त्यानंतर त्यात वाढ होऊ लागली. मार्चच्या सुरुवातीला उन्हाचा कडाका जाणवू लागल्यानंतर फळे तयार होण्याचा वेगही वाढला. परिणामी, आंबा काढण्यासाठी बागायतदारांची कसरत सुरू झाली. पहिल्या टप्प्यातील उत्पादन मार्चअखेरपर्यंत राहील, असे बागायतदारांचे म्हणणे आहे. www.konkantoday.com