पालकमंत्र्यांच्या विनंतीवरून शेतकरी अविनाश काळे यांचे उपोषण स्थगित
रत्नागिरी : वानर, माकडांच्या त्रासामुळे शेतकरी हवालदिल आहे. त्यामुळे वानरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, या मागणीसाठी शेतकरी अविनाश काळे यांनी कालपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू केलेले उपोषण आज दुपारी 12 वाजता स्थगित केले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दुपारी काळे यांची उपोषणस्थळी भेट घेऊन वनमंत्र्यांसोबत बैठक घेण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न मी समजून घेतले आहेत. शेतकऱ्यांना माझा पाठिंबा आहे. परंतु वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे जपानच्या दौऱ्यावर आहेत. ते ११ तारखेला आल्यानंतर पुढील आठ दिवसांत त्यांच्यासमवेत अविनाश काळे व रत्नागिरीतील शेतकऱ्यांची बैठक आयोजित करू. यातून मार्ग निघेल, असे मी आश्वस्त करतो. आपण उपोषण स्थगित करावे.
या विनंतीला मान देऊन अविनाश काळे यांनी आमरण उपोषण स्थगित केले. बैठकीत तोडगा न निघाल्यास पुन्हा उपोषण करू, असा इशाराही अविनाश काळे यांनी दिला आहे. उपोषणाकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तन, मन, धनाने सहकार्य केले. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, उदय बने, आंबा बागायतदार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश साळवी, सहकारतज्ज्ञ अॅड. दीपक पटवर्धन, सांगलीतील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील हे आले होते. अहमदाबाद येथूनही फोन आले. शेतकऱ्यांच्या पाठीशी माध्यमे उभी राहिल्याबद्दल आभार मानले.
www.konkantoday.com