
खेड तालुक्यातीलसुमारगडावर अडकलेल्या गिर्यारोहकांची सुटका
खेड तालुक्यातील सुमारगडावर रात्रीच्या वेळी अडकलेल्या गिर्यारोहकांची येथील पोलिसांकडून सुखरूप सुटका करण्यात आली. पोलिसांच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मुंबईवरून आलेले गिर्यारोहक ज्ञानेश्वर खाडे (अंबरनाथ), योगेश खोपकर (वडाळा), जालिंदर सिंग (ऐरोली) व अनुराग आर्य (वडाळा) हे रसाळगडावरून सुमारगडच्या दिशेने गिर्यारोहण करताना रात्रीच्या वेळी रस्ता विसरल्याने जंगलात अडकले होते. त्यात पावसाचाही जोर वाढल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. याशिवाय हिंस्त्र पशुंचा सुद्धा वावर असल्याने त्यांना कुठे जावे हे कळत नव्हते. याबाबत येथील पोलीस स्थानकात ११२ वरून सुमारगडावरती अडकल्याचे कळवण्यात आले.
याबाबतची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. पथकात पोलीस कर्मचारी बुरूडकर, माने यांनी रात्रीच्या वेळी वाडीबेलदार ठिकाणी जावून माहिती घेत त्यांची सुखरूप सुटका केली. याकामी वाडी जैतापूरचे पोलीस पाटील बाळकृष्ण कासार, मालदेचे भार्गव चव्हाण, सुमारगड-धनगरवाडीतील ग्रामस्थ राया भंडारे, सचिन मोरे यांनीही महत्वाची भूमिका बजावली. www.konkantoday.com