
कोकणात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता
सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील अनेक भागात मोठा पाऊसझाल्यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. अशातच आता पुन्हा राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकणातील जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30 ते 40 किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (40 ते50 किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.