
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सिंधुदुर्गात तीव्र आंदोलन केले जाणार -आ.वैभव नाईक__________ महाराष्ट्र सरकारने शासनाच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचे धोरण आखले आहे.शासन निर्णयाद्वारे कंत्राटी पदे भरण्यासाठी ९ कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कंत्राटी भरतीने मिळालेल्या नोकरीची शाश्वती दिली जात नाही. पगार देखील वेळेवर दिला जात नाहीत हे आतापर्यंत केलेल्या कंत्राटी भरतीचे उदाहरण आहे. त्यामुळे आता सर्वच ठिकाणी कंत्राटी भरती प्रक्रिया राबविली गेल्यास मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जाणार आहे. तसेच शासनाच्या भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून या कंत्राटी भरतीला तीव्र विरोध होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण बेरोजगारांचा देखील याला विरोध आहे. त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष साथ देणार आहे. ही कंत्राटी भरती रद्द करून शासनाने लवकरात लवकर शासकीय भरती प्रक्रिया राबवावी यासाठी गणेशोत्सव झाल्यावर शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही तरुण बेरोजगारांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडणार आहोत असा इशारा कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.
आ. वैभव नाईक म्हणाले, महाराष्ट्र सरकारने काढलेल्या शासन निर्णयात कंत्राटी पदे भरण्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या ९ कंपन्या भाजपच्या निकटवर्तीयांच्या आहेत. यातील क्रिस्टल इंटग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि.ही कंपनी तर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची आहे. या कंपनीने याआधी अनेक विभागात कंत्राटी पदे भरण्याचा ठेका घेतला होता आणि त्यातील कर्मचारी वर्गाचा पगार थकविला होता हा इतिहास आहे.
www.konkantoday.com