
रिफायनरीविरोधी लढ्यात शिवसेना (ठाकरे गट) भूमीपुत्रांसोबत- सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केली भूमिका
ज्या ठिकाणी स्थानिक भूमीपुत्रांचा प्रकल्पाला विरोध असेल त्या ठिकाणी शिवसेना पक्ष नेहमीच जनतेच्या बाजूने राहिली, अशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. त्यामुळे बारसू, सोलगाव, गोवळ पंचक्रोशीतील स्थानिक भूमीपुत्रांनी उभारलेल्या रिफायनरी प्रकल्पविरोधी लढ्यात शिवसेना स्थानिकांच्या पाठिशी राहिल, अशी ग्वाही शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवाचे गोठणे येथे दिली.
सोलगाव, बारसू, गोवळ पंचक्रोशीतील महिला ग्रामस्थांच्यावतीने देवाचे गोठणे केरावळे येथे हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), उपनेत्या सुषमा अंधारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी उपस्थित महिलांकडून रिफायनरीच्या आंदोलन तसेच आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या दमदाटीबाबत माहिती घेतली. त्यानंतर बोलताना त्यांनी शासनाचा समाचार घेतला. आपली जमीन व घर वाचविण्यासाठी लढणार्या महिलांवर जर शासन काठ्या चालवणार असेल तर आपले घर आणि जागा सोडतील का? जर मुख्यमंत्री असा करू शकत नाहीत तर या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तरी आपली जागा का सोडावी, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
आम्ही महिला चांगला स्वयंपाक करू शकतो, चांगल्या प्रकारे संसार करू शकतो तर मग आमच्या कुटुंबावर कोणी वाकडी नजर करून बघत असेल तर आम्ही त्याला इंगाही दाखवू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. www.konkantoday.com