
महाराष्ट्रातील वातावरण कधी नव्हे इतके अस्थिर, असुरक्षित ,जातीपातींनी फाटलेलंसंजय राऊतांचा आरोप
ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील वातावरण कधी नव्हे इतके अस्थिर, असुरक्षित ,जातीपातींनी फाटलेलं आहे. ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा पासून राज्यात जातीपातीचे राजकारण सुरु झाले. गेले दहा वर्षे महाराष्ट्र फाटलाय, जातीपातीत तुकडे पडले आहेत, अशी टीका राऊतांनी केली.
विश्वासाचं नातं सरकारसोबत राहिलेलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षण देऊ म्हटलं होतं. आमचं सरकार आल्यास 24 तासांत मराठा आरक्षण देऊ म्हणणारे फडणवीस आता काय करत आहेत? आता त्यांचे फुलबाजे विझले काय? त्यामुळे त्यांच्यावर विश्वास कोण ठेवणार. जरांगे पाटील यांची भूमिका योग्य आहे,असं राऊत म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
बुधवारी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी देशभरातीत १४ नेते उपस्थित राहणार आहेत. यावर बोलताना राऊत म्हणाले की, ‘तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी हे बैठकीला हजर राहणार नाहीत. कारण त्यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटिस बजावली असून त्यांना ईडीसमोर हजर राहावं लागणार आहे. हा सरकारचा रडीचा डाव आहे.’
आमच्या समितीतील नेते हेमंत सोरेन, आघाडीतील इतर काही नेते आणि माझ्यावर दबाव आहे. काही झालं तरी या दबावासमोर झुकायचं नाही, असं आम्ही ठरवलं आहे. अभिषेक बॅनर्जी हे बैठकीला येणार नाहीत. त्यामुळे संपूर्ण देशात संदेश जाईल ते का बैठकीला येऊ शकले नाहीत, असं ते म्हणाले.
जागावाटपात कसलीही अडचण येणार नाही. आमची लढाई सत्तेसाठी नसून हुकूमशाही उलथून टाकण्यासाठी आहे. त्यामुळे आम्ही वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवला आहे, असं राऊत म्हणाले.
www.konkantoday.com