मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा; चाकरमान्यांचा परतीचा प्रवास रखडत


कोकणात शिमगा सणाच्या निमित्ताने आलेले व सलग सुट्ट्यांचा आनंद घेऊन परतीच्या प्रवासाला लागलेल्‍यांना चाकरमान्यांना व पर्यटकांना माणगावजवळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. रविवारी बहुतांश चाकरमानी मुंबई, ठाण्याकडे परतण्यास निघाले असता मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी चक्का जाम होता. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्‍याने वाहनचालकांसह प्रवाशांना ताटकळत राहावे लागले.होलिकोत्‍सवापासूनच माणगावमध्ये वाहतूक कोंडीला सुरुवात झाली आहे. त्यात मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरण संथ गतीने सुरू असल्‍याने काही किलोमीटर प्रवासासाठी जवळ-जवळ दोन ते तीन तास लागल्‍याने मुंबईतील काही प्रवाशांनी सांगितले.

काही वाहनचालक ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव गाड्या चालवतात. त्‍यामुळे अपघात होतात, शिवाय वाहतूक कोंडीतही भर पडते. ग्रामीण भागातील नागरिकांना माणगाव शहरात आल्‍यावर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो.चाकरमान्यांना परतीच्या प्रवासात त्रास होऊ नये म्हणून मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी अवजड वाहनांना वाहतूक बंदी करण्यात आली होती, परंतु त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. माणगावात कळमजे फाटा ते ढालघर फाटादरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button