सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज’ स्पर्धेत पाटगावची निवड


केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज’ स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगावची निवड झाली आहे.राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्रातून एकमेव पाटगावची निवड होणे ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. या गावातील उपक्रमांची दखल देशपातळीवर होणे ही अभिमानास्पद बाब असून हा कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे. हा उपक्रम देशातील पथदर्शी उपक्रम ठरेल, अशा शब्दांत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी हा उपक्रम राबविणाऱ्या सर्वांचे कौतुक करुन पाटगावला राष्ट्रीय स्तरावरही नामांकन मिळण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शाश्वत विकासाचा पथदर्शी प्रकल्प राबविणाऱ्या पाटगावची सामाजिक, नैसर्गिक, आर्थिक निकषाच्या आधारे या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतून केवळ 50 गावे या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवडली गेली असून यातील फक्त 10 गावांची निवड अंतिम फेरीसाठी होणार आहे.

वैविध्यपूर्ण निसर्ग संपदेने नटलेल्या पाटगाव परिसरात ‘मधाचे गाव पाटगाव’ या उपक्रमांतर्गत पाच ग्रामपंचायतीमध्ये याठिकाणी तयार होणाऱ्या शुद्ध व नैसर्गिक मधाची निर्मिती, विक्री व मध पर्यटनातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत आहे, यामुळे ही गावे स्वयंपूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button