
पावसाळा तोंडावर आला तरी रत्नागिरीतील शहरातील मुख्य रस्त्याच्या मारूती मंदिर ते एसटी स्टँड साईडपट्टीचे डांबरीकरणाचे काम ठप्प.
पावसाळा तोंडावर आला तरी रत्नागिरीतील शहरातील मारूती मंदिर ते एसटी स्टँड या मुख्य रस्त्याच्या साईडपट्टीचे डांबरीकरणाचे काम ठप्प झाल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मारूती मंदिर ते एसटी स्टँड या भागातील एका बाजूचे कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असून ना. अजित पवार यांच्या दौर्यानंतर कॉंक्रीटीकरणाचे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूचे काम पूर्णपणे थांबले आहे. ज्या रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले आहे त्या रस्त्याच्या बाजूला असलेला मोठ्या साईडपट्टीच्या डांबरीकरणाचे काम तातडीने होणे आवश्यक होते. परंतु ते अद्याप झालेले नाही त्या भागातून पाईपलाईन घालण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते.

मात्र सध्या पाईपलाईनचाही पत्ता नाही व डांबरीकरणाचा पत्ता नाही. या साईडपट्टी भागात केवळ खडी आणि वाळू टाकण्यात आल्याने या भागातून वाहने नव्हे तर पादचार्यांना चालणेही मुश्किल झाले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी शहरासह आपल्या मतदार संघात मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला चालना देणारे नवीन प्रकल्प उभारले आहेत मात्र आता या रस्त्यावरून पर्यटक व वाहनधारक जात असल्याने अनेक वेळेला साईडचा पट्टा डांबरीकरण न केल्याने वाहतूक ठप्प होत आहे. जर पावसापूर्वी या डांबरीपट्ट्याचे काम पूर्ण झाले नाही तर नुसती टाकलेली खडी व वाळू पावसामुळे वाहून जाणार आहे. याशिवाय या साईडपट्टीचे डांबरीकरण न झाल्याने रोज किरकोळ अपघात होत आहेत. त्यामुळे या भागातील साईडपट्टीचे डांबरीकरण तातडीने करण्यात यावे अशी नागरिकांची मागणी होत आहे.


रत्नागिरीतील शहराचे सुशोभिकरण आणि विकासाच्या दृष्टीने नगरोत्थान योजनेतून सुमारे १०० कोटी रुपये खर्चुन मुख्य रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम केले जातेय. त्यामुळे सध्या तरी ’रस्ता झाला छोटा वाहन चालक वाहन चालवतोय कसाबसा अशी अवस्था झाली आहे.