
कोकणात आपत्ती सौम्यीकरणासाठी 3200 कोटी तर रत्नागिरी जिल्ह्याला 900 कोटी : ना. उदय सामंत
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्यावर्षी 300 कोटींचा निधी आपत्ती सौम्यीकरणासाठी आला होता. मात्र नैसर्गिक आपत्तीने हाहा:कार माजविल्याने आणि वित्त व जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाल्याने यावेळी जिल्ह्याला 900 कोटींचा निधी मिळणार आहे. कोकणात आपत्ती सौम्यीकरण प्रकल्प राबविण्यासाठी अंदाजित 3200 कोटीपर्यंत होणार्या खर्चास मंत्रिमंडळाने तत्वतः मान्यता दिली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यामध्ये 200 कोटी भूमिगत विद्युत वाहिन्यांसाठी, 58 कोटी धूपप्रतिबंधक बंधारे, 26 कोटी जिल्ह्यातील सैतवडे, हर्णै, दाभोळ या तीन ठिकाणच्या बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी देण्यात आले आहेत. या निवारा केंद्राचे काम निविदा प्रक्रियेपर्यंत आले आहे. तर भूमिगत विद्युत वाहिन्यांचे काम रत्नागिरी शहरात 70 टक्के पूर्ण झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत अनेकदा विहिरी, रस्ते यांना फटका बसतो. ही कामे पुढच्या 48 तासांत सुरु करण्यात यावीत, यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी तालुक्यातील चांदेराईतील काम थांबले असून ते लवकर सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. एसटी महामंडळालाही कोणत्याही मार्गावरील वाहतूक बंद न ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. ज्या ठिकाणी रस्ता खराब झाला असेल तर त्याबाबत खबरदारी घेण्यात येणार आहे. बांधकाम विभागाला याबाबत तातडीने बैठका घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे ना. सामंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.