
राजापूर अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांचे अर्ज ठरले वैध
राजापूर : राजापूर अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल 38 उमेदवारांचे सर्व अर्ज सोमवारी झालेल्या छाननीत वैध ठरले आहेत. राजापूर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या 15 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 30 डिसेंबर अखेर 38 उमेदवारांनी विविध प्रवर्गातून अर्ज दाखल केले होते. यामध्ये सत्ताधारी सहकार पॅनेलकडून 15, परिवर्तन पॅनेलकडून 15 व अन्य 8 जणांनी अर्ज दाखल केले होते. सोमवारी राजापूरचे सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सहाय्यक निबंधक कार्यालय येथे झालेल्या छाननीत विविध प्रतिनिधी संचालक प्रवर्गातून 30 उमेदवारांनी दाखल केलेले 38 अर्ज वैध ठरले आहेत. मंगळवारी 3 जानेवारी रोजी ही यादी प्रसिद्ध होणार असून, 17 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत राहणार आहे.