
कुडूकखुर्द बौध्दवाडी येथील ग्रामस्थ पाण्यापासून वंचित
मंडणगड : कुडूकखुर्द बौध्दवाडी येथील नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवून नळपाणी योजनेचे काम सुरू आहे. वाडीतील नागरिकांची गैरसोय करणार्या सर्व संबंधितांच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) यांच्यावतीने 2 जानेवारी रोजी तहसीलदारांकडे निवेदन सादर करण्यात आले.
जिल्हाधिकार्यांसाठी दिलेल्या निवेदनानुसार गेल्या सहा दिवसांपासून कुडूकखुर्द बौध्दवाडी येथे पाण्याची गैरसोय करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील बौध्दवाडीतील नागरिकांसाठी नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था कार्यान्वित होती. परंतु शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून योजनेचे काम सुरू आहे.
या संदर्भात सरपंच यांच्याकडे वाडीतील ग्रामस्थांनी चौकशी केली असता त्यांनी मंजूर कामाच्या कार्यारंभ आदेशाची प्रत दाखविण्यास टाळाटाळ केली. मागासवर्गीय वस्तीतील नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. तरी तहसीलदारांनी या संदर्भात चौकशी करून वाडीतील नागरिकांच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
ग्रामस्थांची मागणी मान्य झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर पार्टीचे तालुका अध्यक्ष राजेश साळवी, राजेश गमरे, युवा कार्यकर्ता राजेश खैरे, महेश मर्चंडे, सुनील मोरे, सौरभ खैरे यांच्या सह्या आहेत.