
संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकातील अस्वच्छतेमुळे प्रवासी त्रस्त
संगमेश्वर (प्रतिनिधी) ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान राबविले असले तरी रेल्वेला त्याचे काही घेणे- देणे नसल्याचे दिसून येत आहे. संगमेश्वर रोड स्थानकात विविध ठिकाणी अस्वच्छतेमुळे प्रवांशांचे हाल होत आहे.
स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत या संकल्पने अंतर्गत कोकण रेल्वेने सर्व स्टेशन परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. परंतु थोड्याच दिवसात त्याचा बोजवारा उडालेला दिसत आहे.
स्थानक परिसरात अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच काही ठिकाणी पाणी पिणेही जिकरीचे झाले आहे.
लाखो रुपये या स्थानकातून कोकण रेल्वेला उत्पन्न मिळत असते. परंतु प्रवाशांना सेवा-सुविधा कोणतीच मिळत नाही, असे पत्रकार संदेश जिमन यानी म्हटले आहे.
फलाट क्रमांक 2 वर असलेल्या पिण्याच्या पाण्याचे नळच गायब झाले आहेत. स्थानकात असलेल्या पाणपोईंना पाणी असेलच याची शाश्वती नसते. तसेच स्थानक परिसरातील शौचालयाची अवस्था कधी कधी बघवतच नाही.
तेव्हा याची योग्य ती दखल संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक प्रशासन घेईल का? असा सर्वसाधारण प्रश्न संगमेश्वरवासिय प्रवाशांना पडला आहे.
www.konkantoday.com