
ई-कार्ड काढण्याचे काम करण्यास आशा सेविका नाराज
रत्नागिरी : शासनाकडून ई-कार्ड काढण्याचे काम लवकरच आशा सेविकांवर सोपवण्यात येणार आहे. त्याला मिळणारा मोबदला कमी आहे. त्यामुळे शासनाने किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करून हे काम करून घ्यावे आणि या कामाची सक्ती करू नये, अशी मागणी आशा सेविका, गटप्रवर्तक आणि आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष शंकर पुजारी आणि सुमन पुजारी यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केले. महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांना यापूर्वीच 78 कामे नेमून देण्यात आली आहेत. गटप्रवर्तक महिलांना सुद्धा कामे नेमून देण्यात आलेली आहेत. या कामांशिवाय अनेकवेळा जिल्ह्यातील अनेक आरोग्य अधिकारी स्वतःच्या मनाला येईल ते काम आशा महिलांना करण्यास सांगतात. त्या कामाचा कसलाही मोबदला आशांना मिळत नाही. नियमित कामे करण्यासाठीच आशा महिलांना दररोज आठ तासापेक्षा जास्त वेळ लागतो. शिवाय कामावर आधारित मोबदला मागील अनेक वर्षांपासून वाढवण्यात आलेला
नाही.
ई-कार्ड ओळखपत्र काढण्याचे काम आशा महिलांनी करावे, असे परिपत्रक सहसंचालक आरोग्यसेवा यांनी काढलेले आहे. आशा व गटप्रवर्तक महिला या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करतात. त्यामुळे आशांना आदेश देण्याचा अधिकार सहसंचालक आरोग्य सेवा यांना अधिकार नाहीत.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशांना हे काम देण्याबाबतचा आदेश काढलेला नाहीत. इतकेच नव्हे तर आशा महिलांना अद्यापही मंजूर असूनही राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत अँड्रॉईड मोबाईल दिलेला नाही. हे ई-कार्ड काढण्याचे काम मोबाईलद्वारे करावे लागणार आहे. इतकेच नव्हे तर सर्वच आशा महिलांना मोबाईलवर कार्ड काढून देणे शक्य नाही. परंतु, आतापासूनच परिपत्रक काढून अनेक जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी हे काम केलेच पाहिजे, अशी सक्ती करत
आहेत. आशा महिलांना हे काम करण्याबाबत सक्ती करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.