
ऐन दिवाळीत 600 परिचारिकांच्या सेवा थांबविण्याचे आदेश
रत्नागिरी : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तब्बल 600 परिचारिकांच्या सेवा दि. 31 ऑक्टोबरपासून थांबविण्याचे आदेश केंद्र शासनाने राज्याच्या आरोग्य विभागास दिले आहेत. यात रत्नागिरी जिल्ह्यातील 19 नर्सचा समावेश आहे. अभियानातील 600 महिलांची नोकरी ऐन दिवाळीत जाणार असल्याने तब्बल 31 जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रातील ग्रामीण आरोग्य यंत्रणेवर ताण वाढणार आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी ऑगस्टमध्ये याच नर्सेसच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश अचानक धडकले होते. प्रसिध्दी माध्यमांनी ही बाब उजेडात आणल्यावर सरकारने माघार घेत सर्व नर्सेसच्या सेवापूर्ववत केल्या होत्या. पण आता मात्र वर्षभर नंतर पुन्हा एकदा नेमक्या त्याच नर्सच्या बाबतीत पद कपातीचे आदेश काढण्यात आले आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सध्या बिगर आदिवासी क्षेत्रात 3 हजार 207 एएनएम पदे मंजूर आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्राच्या आरोग्य सेवा आयुक्तांनी तेवढीच पदे प्रस्तावित करणारा अंमलबजावणी आराखडा मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवला होता. त्यातील 2 हजार 610 पदांना मंजुरी देऊन केंद्र शासनाकडून 597 पदे नामंजूर करण्यात आली. त्यामुळे एएनएम ही पदे 31 ऑक्टोबर पूर्वी रद्द करण्याचे आदेश अभियानाचे सहसंचालक डॉ. विजय कंदवाड यांनी 18 ऑक्टोबर रोजी संबंधित जिल्हा परिषदांना बजावले आहेत. 31 ऑक्टोबर नंतर अशा पदांचे वेतन अदा करू नये, असेही सीईओंना निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यासाठी 101 एएनएम पदांचे मंजुरीचे प्रस्ताव शासनाकडे देण्यात आले. यातील 82 पदांना प्रत्यक्ष मंजुरी देण्यात आली. यातील 19 जणांची सेवा समाप्त करण्यात आली
आहे.