
शेतीची राखण करणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर बिबट्या धावून आला आणि….
संगमेश्वर : आपल्या अंगावर चाल करून येणार्या बिबट्यापासून कुळ्येवाशी गावातील शेतकर्याने ऐनवेळी झाडावर चढून तसेच आरडाओरडा करत आपला जीव वाचवला. झाडावर चढून गावात फोन केला आणि ग्रामस्थांना बोलावून घेतले. यावर ग्रामस्थ आवाजाच्या दिशेने आले आणि बिबट्या पळून गेला. शेतीची राखण करणार्या शेतकर्याचे प्राण वाचल्याची ही घटना शुक्रवारी रात्री घडली.
आत्माराम गावडे असे या शेतकर्याचे नाव आहे. गावात भात शेती तयार झाली आहे. यातच पाऊस पडत असल्याने शेतीची कापणी रखडली आहे. शेतीची वन्यप्राण्यांकडून नासधूस होऊ नये, यासाठी शेतकरी रात्रभर राखण करतात. याचप्रमाणे गावडे हे ‘गंगेचे तळे’ या ठिकाणी असलेल्या भातशेतीची राखण करण्यासाठी शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास गेले. शेतीच्या कडेला जाऊन उभे राहिले. यावेळी ते नेहमीप्रमाणे बॅटरी मारून परिसरात पाहणी करत होते. बॅटरी सर्व बाजूने फिरवत असताना बॅटरीचा फोकस जवळच असलेल्या बिबट्यावर पडला अन् गावडे यांची पाचावर धारण बसली. त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र बिबट्या त्यांच्याच बाजूने पुढे येऊ लागला. यावर गावडे यांनी ऐनाच्या झाडाचा आधार घेतला. घाबरलेल्या स्थितीत झाडावर चढताना ते एकदा खाली पडले. तरीही जीवाच्या आकांताने ओरडत ते झाडावर चढून बसले. हा बिबट्याही झाडापाशी आला. या बिबट्याच्या कृतीने गावडे पुरते घाबरले. त्यांनी मोबाईलवरून ही बाब गावकर्यांना सांगून ताबडतोब ‘मला वाचवायला या’ असे सांगितले. यावर दहा ते बारा ग्रामस्थ आवाजाच्या दिशेने बॅटर्या घेऊन धावले. त्यांना पाहून बिबट्याने तेथून पळ काढला. त्यानंतर गावडे झाडावरून घाबरलेल्यास्थितीत उतरले. जीव वाचल्यामुळे ग्रामस्थांचे आभार मानून घरी परतले. ग्रामस्थ वेळेवर पोहोचले नसते तर बिबट्याचा हल्ला झालाच असता, अशी भावना गावडे यांनी व्यक्त केली.