सराफ व्यापाऱ्याचा गळा आवळून खून करणाऱ्या संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ

रत्नागिरी : सोन्याच्या आणि पैशाच्या हव्यासापोटी रत्नागिरी येथे गळा आवळून खून केल्यानंतर ठाणे येथील सोने – चांदीचे व्यापारी किर्तीकुमार अजयराज कोठारी (वय 55, भाईंदर) यांचा मृतदेह गुहागर तालुक्यातील आबलोली येथे फेकून देण्यात आला. व्यापाऱ्याच्या हातातील व अंगावर असलेले सोने काढून घेण्यात आले. त्याची बॅग संगमेश्वर येथील पुलावरून फेकून देण्यात आली. मोबाईल मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये ठेवून लोकेशन मुंबई दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या साऱ्या घटनांचे पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी संशयितांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी न्यायालयासमोर केली. त्यानुसार या संशयितांच्या पोलिस कोठडीत 1 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. भूषण सुभाष खेडेकर- रा. खालची आळी रत्नागिरी, महेश मंगलप्रसाद चौगुले – राहणार-मांडवी रत्नागिरी आणि फरीद महामुद होडेकर- राहणार-भाट्ये-रत्नागिरी अशी या तिघा संशयितांची नावे आहेत. हे तीनही संशयित पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती सरकारी वकील विद्यानंद जोग आणि शहर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी न्यायालयात दिली. खून केल्यानंतर संशयितांनी रत्नागिरीतून आबलोली -शृंगारतळी -चिपळूण-वालोपे-संगमेश्वर मार्गे रत्नागिरी असा 245 मैल प्रवास केला, असे पोलिस तपासात उघड झाले आहे. व्यापाऱ्याकडून घेतलेल्या सोन्याची लगड कोठे बनवली, गोणता-दोरी कोठून घेतली याचा तपास करण्याचे काम अजून सुरू आहे. संशयित दिशाभूल करत असल्याने पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी करण्यात आली.
संशयितांचे वकील मधुरा आठल्ये आणि आदेश चवंडे यांनी पोलिस कोठडीत वाढ करू नये, अशी मागणी केली. सोन्याची लगड विकून मिळालेले पैसे पोलिसांना मिळालेले आहेत. गळा आवळून खून केल्याने कपड्यावर रक्ताचे डाग नाहीत. त्यामुळे पोलीस कोठडीची गरज नाही. मोबाईल शोधण्यासाठी पोलीस मुंबईत गेलेले नाहीत. बॅगचा तपास अजून पोलीस कसा करणार असा सवाल वकिलांनी केला. यानंतर मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी पोलिस कोठडीत वाढ केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button