‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ या मोहिमेला रत्नागिरी जिल्ह्यात प्रारंभ

रत्नागिरी : नवरात्र उत्सवाच्या काळात महिलांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आरोग्य विभागाने हाती घेतला आहे. ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ या संकल्पनेंतर्गत याकाळात 18 वर्षांवरील महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात या उपक्रमाला सोमवारपासून सुरूवातही झाली आहे. प्रामुख्याने घरातील स्त्री आरोग्यदृष्ट्या सशक्त असेल, तर घर सुरक्षित ही संकल्पना घेऊन नवरात्र उत्सवाच्या काळात ही योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली असून आरोग्य विभागाबरोबरच महापालिका, आदिवासी तसेच महिला व बालविकास विभागाची मदत घेण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना यासाठी आवश्यक ती तयारी करण्याचे आदेश आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आले आहेत. राज्यातील आरोग्य अभियान विभाग, जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये तसेच अंगणवाडी केंद्रात यासाठी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार असून आशा कार्यकर्त्या तसेच अंगणवाडी सेविकांची मदत यासाठी घेण्यात येणार आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आशा स्वयंसेविकांना मदत करण्याचे आवाहन एका पत्राद्वारे केले आहे. विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञांसह खासगी डॉक्टरांनाही सहभागी करुन घेतले जाणार आहे. प्रामुख्याने गर्भवती महिला तसेच नवजात मातांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न असणार आहे. या उपक्रमाला जिल्ह्यात सुरूवात झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button