
खेड तालुक्यातील लोटे येथील गो-शाळा वादाच्या भोवऱ्यात गो शाळा व्यवस्थापनावर कारवाई न झाल्यास महामार्ग रोखण्याचा ग्रामस्थांचा इशारा
खेड दि २५ सप्टेंबर (वार्ताहर) खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत परिसरात असलेली गोशाळा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या गोशाळेच्या मलमूत्रापासून नजीकच्या सोनगाव गावातील ओढा दूषित होत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याने येथील ग्रामस्थांनी संबंधित शासकीय यंत्रणांना निवेदन दिले आहे. या निवेदनाची दखल घेत गोशाळेवर कारवाई न झाल्यास मुंबई गोवा महामार्ग रोखण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामस्थांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कि लोटे ओद्योगीक वसाहत परिसरात असलेली ही गोशाळा अनधिकृत आहे. या गोशाळेला कोणत्याही प्रकराची परवानगी नाही. या गोशाळेत क्षमतेपेक्षा जास्त जनावरे कोंबून ठेवण्यात आलेली आहेत. गो शाळेत असलेल्या जनावरांना पुरेसे खाद्य मिळत नसल्याने ही जनावरे सोनगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात घुसून शेतीचे नुकसान करतात. गो शाळेतील जनावरांना दावणीवर देखील बांधले जात नसल्याने लोटे परिसरात मुंबई गोवा महामार्गावर या जनावरांचे बस्तान असते. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असतो. महामार्गावर फतकल घालून बसणाऱ्या जनावरांमुळे या परिसरात वारंवार अपघात होत असतात. गेल्या काही वर्षात महामार्गावर बसणाऱ्या किंवा उंडारणाऱ्या जनावरांमुळे अनेक अपघात झालेले आहेत.
लोटे ओद्योगिक परिसरात ज्या ठिकाणी ही गो शाळा उभी करण्यात आली आहे. त्या ठिकाणाहून वाहणारा नाला पुढे सोनगावात जातो, याच ओढ्याच्या पाण्यावर सोनगाव येथे वीजनिर्मितीचा छोट्या प्रकल्प असून या विजेच्या प्रकल्पावर सोनगाव येथील पथदीप सुरु आहेत. पाळीव जनावरे याच ओढ्याचे पाणी पितात. शिवाय या ओढ्यावरच कपडे धुतले जातात. गोशाळेच्या मलमूत्राचा विल्हेवाट याच ओढ्यात लावली जात असल्याने ओढ्याचे पाणी पूर्णपणे दूषित झाले असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. येथील ग्रामस्थ याच ओढ्यात गणपती विर्सजन करतात. यावर्षी ग्रामस्थ जेव्हा विसर्जन करण्यासाठी गेले तेव्हा ओढ्यातील दूषित पाणी पाहून ग्रामस्थानी संताप व्यक्त करत सुमारे तीन ते चार तास गणेश विसर्जन रोखून धरले होते. गोशाळेतील एखादे जनावर दगावले तर त्या मृत जनावराची विल्हेवाट देखील ओढ्यातच लावली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे.
गणपती विसर्जनादरम्यान संतप्त झालेल्या नागरिकांनी बैठीक घेऊन ग्रामपंचायतीच्या माध्मयातून ही गो शाळा बंद करण्यात यावी यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक , प्रांताधिकारी, तहसीलदार, एमआयडीसी याना निवेदन दिले आहे. या निवेदनानुसार गो शाळा व्यवस्थापनावर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र ही कारवाई झाली नाही तर येथील ग्रामस्थ मुंबई गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.