
लम्पी आजार ; जिल्हा नियोजनमधून एक कोटी निधीची तरतूद
रत्नागिरी : लम्पी चर्मरोगामुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास सबंधित शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. त्यासाठी एक कोटी निधीची तरतूद जिल्हा नियोजन निधीत करण्यात आली आहे. गाई-बैलांना लम्पी चर्मरोगाची लागण होत असून, वेगाने ही साथ पसरत आहे. त्यावर उपाययोजना करण्यात येत असून कृषी विभागांतर्गत याबाबत आढावा घेण्यात येत आहे. ज्या शेतकरी किंवा पशुपालकांचे पशुधन या आजारामुळे मृत्यू पावले आहेत. त्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणामधील निकषानुसार राज्य शासनाच्या निधीतून भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
लम्पी चर्मरोगाच्या नियंत्रणासाठी आवश्यक लस, औषधी, साधनसामुग्री अशा विविध बाबींवरील खर्चासाठी जिल्हा नियोजन समित्यांनी एक कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्याचा आदेशही देण्यात आले आहेत. लम्पी आजाराबाबत मदतीसाठी पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात अथवा विभागाचा टोल फ्री क्रमांक 18002330418 अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल फ्री क्रमांक 1962 देण्यात आला आहे. याबाबत अधिक माहितीसाठी या संपर्क केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.