
घरगुती अभोग खर्च सर्वेक्षण : रत्नागिरी जिल्ह्यातून शृंगारतळीची निवड
गुहागर : भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयातर्फे भारतात घरगुती अभोग खर्च
सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वप्रथम शृंगारतळीची निवड करण्यात आली असून अधिकार्यांचे एक पथक शृंगारतळीत बुधवारी दाखल झाले. हे पथक शृंगारतळीतील प्रत्येक घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती घेणार आहे.
केंद्र सरकारच्या या सर्वेक्षणाचा कालावधी एक वर्षाचा असून सर्वेक्षण करण्यासाठी अधिकार्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्वेक्षण करताना येणार्या अडचणी व त्यावर कशी मात करायची याविषयीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सर्वेक्षणासाठी निवडलेल्या ग्रामीण आणि शहरी गटांमधून यादृच्छिकपणे 18 कुटुंबांची माहिती 3 महिन्यात एकाच घराला 3 भेटी देऊन संकलित केली जाईल. या 3 भेटींमध्ये टॅब्लेट वापरून घरगुती वैशिष्ट्ये, खाद्यपदार्थ, उपभोग्य वस्तू आणि सेवा व टिकाऊ वस्तूंवरील घरगुती खर्चाची माहिती संकलित केली जाणार आहे.
याविषयी माहिती देताना या केंद्र सरकारच्या सांख्यिकी पथकातील अधिकारी शहाजी पुरी यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव शृंगारतळीची या सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. सुरुवातीला घरोघरी भेट देऊन नागरिकांना याविषयी पटवून सांगणे कठीण जाणार आहे. नागरिकांनी मनात कोणतीही शंका न ठेवता व भीती न बाळगता सर्वतोपरी माहिती देऊन सर्वेक्षणाला सहकार्य करणे महत्त्वाचे
आहे.
राज्यात अनेक शहरातून व ग्रामीण भागातून या सर्वेक्षणाला सुरुवात झालेली आहे. गुहागर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांची आम्ही भेट घेऊन त्यांना याविषयी पूर्ण माहिती दिली असून त्यांनी सहकार्य केले आहे, असे सांगण्यात आले.