
नियम पाळून १० जूनपासून सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची शहर व्यापारी महासंघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
जिल्हा प्रशासनाने लागू केलेला लॉकडाऊन संपल्यानंतर १०जूनपासून नियम पाळून सर्व दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे यानिु आज जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे शहर व्यापारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना आज पत्र देण्यात आले या पत्रात म्हटले आहे की
आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेले 2 महिने कोविड 19 (कोरोना) चा प्रभाव मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनामार्फत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानुसार आपण देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन जाहीर केला. त्याचे पालन करत व प्रशासनाला सहकार्य करत रत्नागिरीतील व्यापाऱ्यांनी आजपर्यंत आपली दुकाने बंद ठेवली. ह्या कालावधीमध्ये व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊनदेखील जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेऊन कोरोनाचे संक्रमण आटोक्यात येत नाही हे ह्यावरून दिसून येते. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात न येण्यामागील कारणे प्रशासनाने अभ्यास करून शोधणे गरजेचे असून त्यासाठी ह्यापुढे व्यापाऱ्यांना वेठीस धरले जाऊ नये, असे व्यापाऱ्यांचे मत आहे. कारण ह्या 2 महिन्यातील लॉकडाऊन च्या काळात व्यापाऱ्यांना येणारी विजबिले, निरनिराळे कर, कामगारांचे पगार व इतर खर्च थांबलेले नाहीत. त्यामुळे गेले 2 महिने व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन फार मोठे नुकसान सहन केले आहे. सर्वसामान्य व्यापाऱ्यांना शासनाकडून कोणतीही नुकसानभरपाई मिळण्याची आशा नाही. आता मात्र व्यापाऱ्यांना नुकसान सहन करणे शक्य नसल्याने व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय सुरू करून आपला चरितार्थ चालवणे भाग आहे. आजपासून राज्यात अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाली असून आपल्या जिल्ह्यामध्ये मात्र 9 जून पर्यंत लॉकडाऊन असल्याने व्यापारी आपल्याला 9 जूनपर्यंत सहकार्य करण्यास तयार आहेत. परंतु दि. 10 जूनपासून आपणाकडून व्यापाऱ्यांना शिथिलता मिळणे आवश्यक आहे.
तरी मी रत्नागिरीतील सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांच्या वतीने ह्या पत्राद्वारे विनंती करतो की, दि. 10 जूनपासून राज्यातील अनलॉक प्रक्रियेप्रमाणे रत्नागिरी मध्ये देखील सर्व प्रकारची दुकाने व आस्थापने सकाळी 7 ते सायंकाळी 5 ह्या वेळेमध्ये सुरू करण्यास आपण परवानगी द्यावी. प्रशासनाचे सर्व नियम व्यापाऱ्यांकडून पाळण्यात येतील. व्यापारी आपला व्यापार करताना सोशल डिस्टनसिंग, सॅनिटायझर व मास्क ह्या नियमांचे पालन करतील. तरी दि. 10 जूनपासून आपण आम्हा व्यापाऱ्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे
www.konkantoday.com




