
दर्याराजा आमचं संकटापासून रक्षण कर; कोकणातील मच्छीमार बांधवांचे समुद्राला साकडे
रत्नागिरी : नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोकण किनारपट्टीवर विविध ठिकाणी सागराची पूजा करण्यात आली. हे दर्याराजा आमचे रक्षण कर, असे साकडे यावेळी घालण्यात आले. पारंपरिक वेशभूषा आणि सवाद्य मिरवणुकीने समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला. नुकताच मासेमारी हंगाम सुरू झाला, मात्र त्यातही वादळाचे संकट उभे राहिले. त्यामुळे मच्छीमार बांधवांच्या नौका पुन्हा किनार्यावर विसावल्या. रत्नागिरी
तालुक्यातील वरवडे येथे नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. कोळी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत प्रतिकात्मक नारळ तयार करून त्याची सवाद्य मिरवणूक काढली. दर्याराजाला नारळ अर्पण करण्यासाठी जाताना महिला व तरुणींनी नृत्याच्या तालावर ठेका धरला. दापोली तालुक्यातील हर्णै, पाजपंढरी, बुरोंडी, दाभोळ येथील कोळीबांधवांचे जीवन पूर्णपणे समुद्रावर अवलंबून आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच पारंपरिक वेशभूषा आणि कोळी बँडच्या तालावर मिरवणूक काढत नारळीपौर्णिमेचा सण कोळीबांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. लहान मुलांसापासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक जण पारंपरिक वेशभूषेत कोळी बँडच्या तालावर नाचत होते. पाजपंढरी गावातून ही मिरवणूक थेट समुद्रापर्यंत काढण्यात आली.



