नवीन गट, गण रद्द; रत्नागिरी जिल्हा परिषदेचे 55 गट आणि पंचायत समित्यांच्या 110 गणांसाठीच होणार निवडणूक
रत्नागिरी : स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका 2017 मधील प्रभागरचनेनुसार घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आल्यामुळे जिल्हा परिषदेचे नव्याने झालेले 7 गट आणि 14 गण रद्द होणार आहेत. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे जि. प. च्या 55 गट आणि दहा पंचायत समित्यांच्या 110 गणांसाठीच निवडणूक होणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी झालेली आरक्षण सोडतही रद्द होऊन पुन्हा नव्याने आरक्षण निघण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषदेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत 55 गट होते. तर पंचायत समितीच्या गणांची संख्या 110 होती. महाविकास आघाडीच्या काळात केलेल्या नव्या रचनेनुसार जिल्ह्यातील 9 तालुक्यांमध्ये 7 गट वाढले होते. नव्या पुनर्रचनेनुसार जिल्हा परिषदेचे गट 62 तर, पंचायत समितीचे 124 गण तयार झाले होते. नव्या प्रभाग रचनेनुसार काही दिवसांपूर्वी गट व गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. जि. प.चा विचार केला तर सर्वसाधारण 22, महिला सर्वसाधारण 20, ना. मा .प्र. महिला 8, ना.मा.प्र. सर्वसाधारण 8, अनुसुचित जाती 3, अनुसुचित जमाती 1 असे आरक्षण पडले होते. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2011 च्या जनगणनेनुसार 2017 मधील प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे आता नव्याने आरक्षण सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे. गट आणि गणाच्या एकूण जागांपैकी 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या होती. नव्या पुनर्रचनेनुसार नवे 7 मतदारसंघ वाढले होते. तसेच नव्या रचनेमुळे 4 गटांची नावे बदलण्यात आली होती.
जि. प. सभागृहाचा कालावधी दि.21 मार्च रोजी संपुष्टात आला आहे. दि. 21 मार्चपूर्वी नवीन कारभारी सत्तेवर येणे अपेक्षित होते. मात्र, विविध कारणांमुळे निवडणुका लांबणीवर पडली. त्यामुळे दि. 22 मार्चपासून मिनी मंत्रालयात प्रशासक राज आले. नियमानुसार जिल्हा परिषदेच्या प्रशासकाची मुदत सहा महिन्यांपर्यंत असते. त्यामुळे दि. 22 सप्टेंबरपर्यंत निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन नूतन कारभारी सत्तेवर येणे अपेक्षित आहे. मात्र, आता प्रभाग रचनेच्या निर्णयामुळे निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.