‘नरक’ समजून घेण्यासाठी ‘गावभवरा’ वाचायला हवं – डॉ. सौ. रेखा देशपांडे
चिपळूण :: आपण मानतो ते ‘स्वर्ग आणि नरक’ असं काही अस्तित्वात नसावं असं मला आजवर वाटायचं. मात्र स्वर्गीय श्रीराम दुर्गे सरांचा ‘गावभवरा’ हा कथासंग्रह वाचल्यावर ‘नरक’ म्हणजे काय? ते कळलं. ‘पशुतुल्य जीवन’ हाही शब्द वापरता येणार नाही इतकं या लोकांचं जीवन भयावह आहे. आपण पांढरपेशी मंडळी गावागावात ज्या सुरक्षित वातावरणात वावरतो तो स्वर्ग आहे. गावकुसाबाहेरील या समाजाचं जीवन साक्षात ‘नरक’ आहे. हक्काचा आश्रय नसलेली ही मंडळी अशा वस्तीत राहतात की ‘कीडे’ बरे म्हणावेत अशी स्थिती आहे. यांच्या दु:खाला पारावार नाही. ‘नरक’ ही संकल्पना म्हणून अंगावर शहारा आणणारी जी रौद्र, बीभत्स वर्णनं आपण ऐकतो ती सारी आपल्याला ‘गावभवरा’तील कथांत भेटतात. सामान्यत: वाचवणार नाहीत अशा या कथा एक शोकांतिका आहेत. प्रचलित व्यवस्थेला प्रश्न विचारणारे काही आशेचे किरण यातील काही कथांत भेटतात. तरीही आपण ‘नरक’ संकल्पना समजून घेण्यासाठी ‘गावभवरा’ वाचायला हवं असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. रेखा देशपांडे यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद चिपळूण आणि कोकण मराठी साहित्य परिषद चिपळूण शाखा यांच्यावतीने संवेदनशील आणि प्रगल्भ सामाजिक भान असणारे ज्येष्ठ साहित्यिक श्रीराम दुर्गे यांच्या प्रथम स्मृतीदिन कार्यक्रमात ‘गावभवरा’ या कथासंग्रहाचे प्रकाशन झाल्यावर त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ‘लोटिस्मा’ वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतिन जाधव, नगरसेवक उमेश सकपाळ, गुहागरचे कवी राजेंद्र आरेकर, पत्रकार शिवाजी गोरे, दुर्गे सरांचे भाऊ प्रदीप दुर्गे उपस्थित होते. ‘गावभवरा’ या कथासंग्रहाचा परिचय करून देताना डॉ. रेखा देशपांडे पुढे म्हणाल्या, कथासंग्रहात भेटणारे वैदू, पारधी, वासुदेव, पिंगळा, लमाणी, गोंधळी, कैकाडी, दरवेशी, मदारी, अस्वलाचे खेळ करणारे, नंदीबैलवाले, भोरपी, बहुरूपी, मसनजोगी आदी भटके लोक हे उत्तम कलाकार आहेत. परंतु त्यांना पोटासाठी, अन्नासाठी वणवण करावी लागते. पूर्वी या लोकांना राजदरबारात आपल्या कला सादर करण्यासाठी ‘आश्रय आणि प्रतिष्ठा’ मिळायची. कालांतराने हे सारं मागे पडत गेलं. कला दाखवायच्या संधी कमी होत गेल्या. अडचणी वाढल्या. ही लोकं गावोगावी फिरू लागली. कालांतराने गावंही ओसाड पडू लागल्यावर, करमणुकीची साधनं वाढल्यावर यांचं जीवन जगण्याचं गणित बिघडत गेलं. या लोकांचं जीवन नक्की कसं आहे? याचं दर्शन आपल्याला या कथासंग्रहातून घडतं. कोकणात या समूहांची संख्या खूप कमी आहे. गोंधळी, वासुदेव अजूनही आपल्याकडे येतात. आपण बालपणी यांना पाहिलेलं असल्याचं डॉ. सौ. देशपांडे म्हणाल्या. या कथासंग्रहातील साऱ्या समाजात अंधश्रद्धा प्रचंड आहेत. यांची प्रत्येकाची स्वतंत्र संस्कृती आहे. आख्यायिका जोडलेल्या आहेत. दैवत वेगळं आहे. दैवताचे मिळणारे आदेश वेगळे आहेत. कथेतील समाजांचं सगळं आयुष्य एक शोकांतिका आहे. वाचवत नाहीत अशा या कथा आहेत. आजच्या काळात गाववाले या लोकांना ‘चोर’ समजतात. वास्तविक गावागावात होणाऱ्या चोऱ्या ह्या गावातल्या लोकांनी केलेल्या असतात. मात्र आरोप या लोकांवर घेतले जातात. अमानुष मारहाण करतात. कोणत्याही कारणाने का असेना, कोणीही ‘वाली’ नसल्याने मरेपर्यंत मारहाण ही यांच्या पाचवीला पूजलेली आहे. संग्रहातील दुष्काळाची वर्णनं आपल्याला वाचवत नाहीत अशी आहेत. श्रीराम दुर्गे सरांच्या जागल्या, चौथी क्रांती आदी कादंबऱ्या, कथा, कविता प्रसिद्ध आहेत. त्या गाजलेल्या आहेत, वाचनीय आहेत. दुर्गे सरांनी यांनी आपल्या लेखनातून समाजव्यवस्थेत असलेल्या भटक्या लोकांच्या जीवंत वेदना मांडण्याचे काम केले आहे. तरीही समाधान न झाल्याने त्यांनी भटक्या लोकांची मनात रेंगाळत राहिलेली दुःख, वेदना स्वतंत्रपणे मांडण्यासाठी ‘गावभवरा’ कथा लिहिल्यात. या कथा वाचताना मन सुन्न होत जातं. अंगावर शहारे येतात. सगळ्या कथांचे ‘कथाबीज’ हे विदारक सत्य आहे. आपल्या समाजात तीन प्रकारची व्यवस्था असते. पहिली गावकुसाच्या आत राहाणारी, दुसरी गावकुसाच्या बाहेर राहाणारी आणि तिसरी गावकुसाच्या बाहेर असलेल्यांवर अवलंबून असलेल्यांची होय. गावकुसाबाहेरच्या ज्या जाती-जमाती आहेत त्या गावकुसात राहणाऱ्या लोकांना ‘पाटीलपांडे’ म्हणतात, आपले धनी, मालक मानतात. गावकुसाच्या आत राहणाऱ्यांनी बाहेरच्यांना जगवायचं असतं. भटक्यांना गावकुसाच्या बाहेर राहणाऱ्या मातंग आणि नवबौद्ध समाजाने सांभाळायचं असतं. भटक्यांनी कोणत्याही गावात आपलं ‘पाल’ टाकण्यापूर्वी गावाच्या पोलीस पाटलांना आपण आल्याचं कळवायचं अशा स्वरुपाची मांडणी असलेलं वेगळं जग या कथासंग्रहात अनुभवायला मिळतं. गावचे पाटील देतील अशा उकिरड्यावर, गटाराच्या कडेला आदी जागांवर यांना ‘पालं’ ठोकावी लागतात. कोणत्या भटक्या समाजाने कोणत्या गावात केव्हा जायचं? किती दिवस त्या गावात राहायचं? कोणत्या गावात, कोणत्या महिन्यात कोणता कलाकर असेल? कोणत्या जाती-जमातीची ‘पालं’ पडलेली असतील याचं अलिखित वेळापत्रक आपल्याला या कथासंग्रहात भेटतं. हे सारं वंशपरंपरागत पिढ्यानपिढ्या चालत आलेलं असल्याचं डॉ. सौ. देशपांडे यांनी यावेळी नमूद केलं.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘भावसुमनांजली’ अंतर्गत प्रा. संतोष गोनबरे यांनी प्रास्ताविक केले. श्रीराम दुर्गे सर हे लेखनातील महामेरू होते. भारत वर्षातील ते एक अनुभव संपन्न लेखक होते. अंगावर शहारा आणणारं लेखन करण्याचं कसब त्यांच्यात होतं. ते हळव्या स्वभावाचे होते. असं सांगून गोनबरे यांनी वर्षभरापूर्वी कोरोना कालखंडातील दुर्गे सरांच्या मृत्यूची मानवी मनाला अस्वस्थ करणारी हकीगत कथन केली. आपल्या मृत्यूनंतर दुर्गे सरांनी ‘गावभवरा’ हा एक एक कसदार कथासंग्रह समाजाला उपलब्ध करून दिल्याचे गोनबरे म्हणाले. यावेळी दुर्गे सरांच्या आठवणी जागवताना संदेश पवार यांनी, कोकणातील साहित्यिकांच्या सन्मानाचा विषय दुर्गे सरांनी लावून धरल्याचे नमूद केले. यावेळी प्रा. डॉ. गुलाब राजे, महंमद झारे, मंगेश बापट आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. यतिन जाधव यांनी दुर्गे सरांना प्रगल्भ समाजभान असल्याचे म्हटले. भटक्यांमागील ‘माणूस’ शोधून त्यांच्या व्यथा-वेदना मांडण्याचे काम या कथासंग्रहाने केल्याचे त्यांनी नमूद केले. राजेंद्र आरेकर यांनी दुर्गे यांच्याविषयीच्या आपल्या वैयक्तिक आठवणींना उजाळा दिला. अन्यायाविरुद्ध बोलताना प्रसंगी दुर्गेसरांना रागाच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. दुर्गे सरांचे भाऊ प्रदीप दुर्गे यांनी बोलताना हे शेवटचं प्रकाशन लातूरला करायचं होतं असं म्हटलं. मात्र तो कार्यक्रम अचानक रद्द झाला. सरांची बहुतांश साहित्यसंपदा चिपळूण या त्यांच्या कर्मभूमीत निपजली असल्याने आपल्या सर्वांच्या साक्षीने आज हे शेवटचं प्रकाशन झाल्याचे म्हटले.
कार्यक्रम प्रसंगी स्वर्गीय श्रीराम दुर्गे सरांच्या तसबीरीला शाल आणि पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आला. यावेळी जेष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, नामवंत कवी आणि समीक्षक अरुण इंगवले, शाहीर राष्ट्रपाल सावंत, शशिकांत मोदी उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार प्रा. अंजली बर्वे यांनी मानले.
www.kokantoday.com