पावसाची उसंत; सरासरी गाठण्यात दमछाक

रत्नागिरी : मागील आठवडाभर पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पावसाच्या सरासरीलाही घसरण लागली आहे. गुरुवारी चिपळूण तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरित तालुके गुरूवारी जवळपास कोरडे होते.
बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात 9 मि. मी. च्या सरासरीने 81 मि. मी. एकूण पाऊस झाला. त्यामध्ये 57 मि. मी. पाऊस चिपळूण तालुक्यात नोंदविला तर पाच तालुके पाऊस निरंक होता. मंडणगड, दापोली प्रत्येकी 4 मि. मी., खेडमध्ये 17 मि.मी. पावसाची नोंद झाली. गुहागर, संगमेश्‍वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर हे पाच तालुके गुरुवारी कोरडेच होते.
जूनच्या पहिल्या पंधरवड्यात जोर धरलेला पाऊस दुसर्‍या पंधरवड्यात ओसरला आहे. जुलै अखेरपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मात्र, त्यामुळे भात शिवारात आता ताप वाढू लागला आहे. वाढत्या तापमानाने पिकावर प्रतिकूल परिणामांची भीती शेतकर्‍यांमध्ये आहे.
काही भागात पाणी ‘लिफ्ट’ करून शिवारात वळविण्याचा खटाटोप सुरू झाला आहे. गेल्या आठवडाभर पावसाचे सरासरी प्रमाणही घटले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1911.56 मि.मी.च्या सरासरीने 17 हजार 204 मि.मी. एकूण पाऊस झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात पावसाने 90 टक्के सरासरी पूर्ण केली होती. गतवर्षी तीन हजार मि.मी.ची सरासरी गाठणार्‍या पावसाने यावर्षी जुलै अखेरपर्यंत दोन हजाराचीही मजल गाठलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button